अमरोहा : लग्न म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे एक सुंदर मंडप, वधू-वर, सुरु असलेलं संगीत, पाहुण्यांची गर्दी आणि लग्नातलं जेवण. मात्र उत्तरप्रदेशात अशी एक घटना घडली आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. त्याचं झालं असं की, अमरोहा जिल्ह्यात लग्नासाठी आलेले पाहुणेमंडळी पाहून कुटुंबीयांच्या नाकीनऊ आले. यानंतर लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाने भन्नाट शक्कल लढवली. वधू पक्षाने दारात आलेल्या वऱ्हाड्यांना चक्क आधार कार्ड दाखविण्याची मागणी केली. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच फक्त लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, अशा लोकांना वधू पक्षाने परत पाठवलं. त्यामुळं लग्नासाठी आलेली मंडळी चांगलीच संतापली. त्यांनी या घटनेचा एक व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केला आहे.
सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी हसनपूर येथील एका वस्तीत दोन वेगवेगळ्या वराती आल्या होत्या. यानंतर जेवण सुरू झाल्यावर दोन्ही ठिकाणी वरातीत आलेले पाहुणे जेवणावर तुटून पडले. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. पाहुण्यांची संख्या पाहून मुलीच्या बाजूचे लोक गोंधळले आणि त्यांनी जेवण बंद केले. मग मुलीच्या कुटुंबीयांनी ठरवले की ज्या पाहुण्याकडे ओळखपत्र असेल, त्यांनाच बँक्वेट हॉलमध्ये प्रवेश मिळेल. ज्या लोकांकडे आधार कार्ड होतं, केवळ त्यांनाच फक्त लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली. . मात्र यामुळे खऱ्या पाहुण्यांचाही भ्रमनिरास झाला कारण प्रत्येकाकडे आधार कार्ड नव्हते.
दरम्यान, या वरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.