नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
दहा केंद्रावर अंदाजे ३०० क्विंटल खरेदी खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी
अकोला : केंद्र सरकारच्या (Central Govt)आधारभूत किंमतीमध्ये (Base prices) नाफेडच्यावतीने (Nafed) सुरु करण्यात आलेल्या उडीद, सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांनी (Farmers) पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल १० केंद्रावर अंदाजे ४०० क्विंटल सोयाबीन खरेदी झाल्याची माहिती आहे. तर नाफेडला उडिदाचा दाणाही मिळू शकला नाही.
महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच, शाहू महाराज की संभाजीराजे?
नाफेडच्या वतीने केंद्राच्या आधारभूत दराने उडीद, सोयाबीन खरेदीची मुदत मंगळवारी संपली. जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादकता १३.७८ क्विंटल असल्यानंतरही एका शेतकऱ्याकडून केवळ हेक्टरी ५.९० क्विंटल खरेदी करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, या दोन्ही उत्पादनाच्या खरेदीकरिता अल्प कालावधी मिळाल्याचे म्हणत खरेदीची मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांतून मागणी उठली आहे.
खरीप हंगामात कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षणामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला होता. सोयाबीन पिकाचे उत्पादन तर प्रंचड घटले होते. उडीदाचे पिक तर अवर्षणाच्या पहिल्याच तडाख्यात जळून गेले. त्यामुळे दोन्ही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली.
सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी; केंद्राच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका
दरम्यान, हंगामाच्या आरंभी यंदा सोयाबीनचा प्रतिक्विंटल भाव पाच हजाराच्यावर गेला होता. कमी उत्पादन झाल्याने भाव यापेक्षाही वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले. मात्र, गेल्या महिनाभरापासून सोयाबीनचे भाव चार हजारांपर्यंत खाली घसरले. सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल चार हजार सहाशे रुपये असताना यापेक्षाही कमी दराने बाजारात त्याची मागणी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडला. नाफेडकडून हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी केवळ पाच दिवस खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली.
पीक कापणीच्या गोषवाऱ्यावर प्रश्नचिन्ह?
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पिक कापणी अहवालानंतर गोषवारा तयार केला होता. त्यात जिल्ह्यातील सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी १४ क्विंटल एवढी दर्शविलेली आहे. तेल्हारा तालुक्यात तर ही उत्पादकता हेक्टरी १७ क्विंटल एवढी आहे. त्यामुळे पिक कापणी अहवालानंतरच्या गोषवाऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. नाफेडच्या खरेदीचाही लाभ होणार नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मुदत व मर्यादाही वाढवा
खरेदीची मुदत व क्विंटची मर्यादा वाढवण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. नाफेडकडून प्रतिहेक्टरी पाच क्विंटल ९० किलो सोयाबीन खरेदीचे आदेश मागे घेऊन, त्याऐवजी हेक्टरी किमान १४ क्विंटल सोयाबीन खरेदीचे आदेश देण्यात यावेत, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शासनाचे वरातीमागून घोडे
उडीद तसेच सोयाबीनचा हंगाम संपला. बाजारात आरंभी साडेपाच हजारावर गेलेल्या सोयाबीनचे नंतर दबावात आले. दरात सातत्याने घसरण होऊन आता कमाल सव्वा चार हजार रुपयांवर आले आहेत. दरम्यान, आधारभूत किंमतीत शेतमाल खरेदीस विलंब होत असून, ही बाब ‘शासनाचे वराती मागून घोडे’ असा प्रकार असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत. हंगामातच शासनाने नाफेडला खरेदीचे आदेश दिले असते तर सोयाबीनचे दर पडले नसते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.