राज्य सरकारकडून अहमदनगरच्या नामांतराच्या हालचाली सुरु, महापालिकेला नामांतराचा प्रस्ताव बहुमताने पाठविण्याचे आदेश
औरंगाबादच्या नामांतरानंतर आता राज्य सरकारने अहमदनगर च्या नामांतराच्या हालचाली सुरु केला आहे. पण अहमदनगर स्थानिक ठिकाणाहून कुणाचीही मागणी नसताना राज्य सरकारने नगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत हालचाली सुरु केल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून महासभेत अहमदनगरच्या नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप आमदार राम शिंदे आणि महादेव जानकर यांनीही नगरच्या नामांतराच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. दरम्यान जुन २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती. अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगरमधल्या चौंडी गावात झाला, या कारणास्तव नगरच नामांतर करावं, असं पडळकर यांनी पत्रात नमूद केलं होतं. याच पत्राच्या अनुशंगाने शासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये नगर महापालिकेला आदेश देत नामांतराबाबत बहुमताचा ठराव करून मागवण्यात आला आहे.
दरम्यान जिल्ह्याच्या नामांतराबाबत अधिनियमात कोणताही ठराव करण्याची गरज नसल्याने महापालिका प्रशासनाचाही सध्या गोंधळ उडाला आहे. कारण महापालिका अधिनियमात असा कोणताही ठराव करण्याची तरतूद नसताना आणि हे महापालिकेच्या अखत्यारित येत नसतानाही सरकारने ठराव मागितला आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.
दुसरीकडे महासभा घेऊन नगरच्या नामांतराबाबत ठराव पाठवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानंतर आता नामांतराचा विषय महासभेत ठेवण्याची भूमिका महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. सध्या नगर महापालिकेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आता नामांतराच्या ठरावाला नगरसेवक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.