प्रसिद्ध रिलायन्स समूहाचे अध्यक्ष दिवंगत धीरजलाल हिराचंद अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांची आज जयंती. धीरूभाई अंबानी हे कायमच भारतातील मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणाऱ्या धीरूभाई यांचं फक्त दहावीपर्यंतच शिक्षण झालं. मात्र, आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ते प्रसिद्ध उद्योगपती म्हणून उदयास आले. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांचा उद्योग जगतामधील प्रवास अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच प्रवासाविषयी जाणून घेऊ.
धीरूभाई अंबानींची गणना प्रसिध्द उद्योगपतींमध्ये केली जाते. त्यांनी जी स्वप्न पाहिलीत ती पूर्ण केलीत. आज त्यांचं कुटुंब पाहिजे ती गोष्ट विकत घेऊ शकतात. त्यांची स्वप्न पुर्ण करू शकतात ते केवळ धीरूभाईंमुळेच. मात्र, धीरुभाईंचा प्रवास फार खाचखळग्यांनी भरलेला होता. धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातच्या चोरवाड इथं झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. धीरूभाईंना चार भावंडे होती. धीरूभाईंचं सुरुवातीचं आयुष्य फार कठीण होतं. मोठं कुटुंब असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा फार सामना करावा लागला. वडिलांची ढासळलेली तब्येत आणि हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे धीरूभाईंना त्यांचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शाळेतील शिक्षकाचा मुलगा असूनही धीरूभाईंचं मन अभ्यासात कमी आणि व्यवसायात जास्त असे. ते फक्त १० पर्यंत शिकलेले होते. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरातील आर्थिक परिस्थिती बदलायची होती. या उत्कटतेमुळं त्यांनी लहान वयातच व्यवसाय सुरू केला. त्या दिवसांमध्ये, बरेच लोक गिरनार हिलवर तीर्थयात्रेसाठी येत असतं. तोच विचार करून किशोरवयीन धीरूभाईंनी तिथं एक भजी आणि चहाची टपरी टाकली. त्यांच्याच कमाईमुळे घराला हातभार लागला. नंतंर धीरूभाईंचं वय जेमतेम १६ वर्षे असेल, ते आपला भाऊ रामणिकलाल कडे येमेनला पैसे कमवण्यासाठी गेले. ही १९४९ ची गोष्ट आहे. तिथं त्यांना पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली. त्यांचा पगार महिन्याला ३०० रुपये होता. धीरुभाईंच्या कामावर कंपनी खूप खूष झाली. त्यांना फिलिंग स्टेशन मॅनेजर बनवल्या गेलं. काही वर्षे काम केल्यानंतर ते १९५४ मध्ये पुन्हा भारतात परतले. धीरूभाईंना हे माहित होते की, जी महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगलीये, ती नोकरी करून पूर्ण होणार नाही. त्यासाठी व्यवसाय करणं गरजेचं आहे. म्हणून ते स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईला आले. त्यावेळेस त्यांच्या खिशात फक्त ५०० रुपये होते. त्यानंतर प्रचंड मेहनत, चाणाक्ष बुद्धी आणि बाजारावरील उत्तम पकड याच्या जोरावर धीरूभाईंनीयांनी अब्जावधींचे साम्राज्य उभं केलं. मुंबईला पोचल्यावर धीरूभाईंनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये नशीब आजमवण्यास सुरूवात केली. त्यांना बाजारपेठेबद्दल बरीच माहिती होत होती. धीरूभाईंच्या हे लक्षात आलं होतं की, पॉलिस्टरला भारतात आणि भारतीय मसाल्यांना परदेशात सर्वाधिक मागणी आहे. येथून व्यवसायाची कल्पना त्यांना सुचली. त्यांनी युक्ती लावली आणि १९६० मध्ये रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. या कंपनीनं परदेशात भारतीय मसाले विकण्यास आणि परदेशातील पॉलीस्टर भारतात विकण्यास सुरवात केली.
तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल. पण हे खरंय आहे की, धीरुभाईंचं पहिलं ऑफीस हे एका छोट्याशी खोलीत होतं. मुंबईच्या मशीद बंदर परिसरातील नरसिनाथन स्ट्रीट जवळ एका खोलीत हे कार्यालय होतं. ती एक ३५० चौरस फूट खोली होती. खोलीत एक टेबल्स, ३ खुर्च्या आणि फक्त एक फोन होता. धीरूभाई अंबानी यांनी आपला व्यवसाय केवळ ५० हजारांचे भांडवल आणि दोन सहाय्यकांनीशी सुरू केला. तिथून झेप घेत ते २००० मध्ये, धीरूभाई देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले. पण ते अधिक काळ या पदाचा आस्वाद घेऊ शकले नाही. ६ जुलै २०२२ रोजी काळाने घात केला आणि मुंबईतील एका इस्पितळात धीरूभाई यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी धीरूभाईंचा व्यवसाय सांभाळत आहेत.