राजकीय नेत्यांचा जसा देशाला दिशा देण्याचा वाटा महत्त्वाचा. तसाच उद्योग उभारून देशाचं आर्थिक प्रगती करणाऱ्या उद्योगपतींचा वाटाही तितकाच मोठा असतो. रतन टाटा हे असेच एक उद्योगपती. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणी मोलाचं योगदान दिलंय. रतन टाटा यांचा आज वाढदिवस. त्यांची उदारता, कर्मचाऱ्यांशी त्यांची वागणूक आणि प्राण्यांवरील प्रेम याविषयी तुम्हाला ठाऊक असेलच. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाहीये की, ते अविवाहित का राहिले? त्यांची प्रेमकथा लग्नापर्यंत का पोहोचली नाही? याच विषयी जाणून घेऊ.
रतन टाटा हे एक असं नाव आहे, ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आज संपूर्ण जग त्यांना ओळखतं. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. उद्योग विश्वातील योगदानासाठी भारत सरकारनं त्यांना २००२ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. हे सगळं यश, वैभव, संपत्ती, किर्ती असली तरी एक प्रश्न मात्र अनेकांना पडतो की रतन टाटांनी लग्न का नाही केलं? अनेकांना तर असं वाटेल की, लग्न करण्यासाठी त्यांना अशी कोणी व्यक्ती सापडली नसेल. किंवा ते कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडले नसतील. पण खरी गोष्ट मात्र वेगळी आहे. असं म्हणतात की खरं प्रेम आयुष्यात एकदाच होतं आणि त्यानंतर पुन्हा अशीच प्रेम भावना निर्माण होणं अशक्यच असतं. ही गोष्ट काही खोटी नाही. रतन टाटा यांच्यासोबतही असंच काहीसं घडलं होतं. मात्र, त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. आपल्या खऱ्या प्रेमासाठी रतन टाटांनी आजतागायत लग्न केलं नाही. रतन टाटा हे आपलं वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमाबद्दल अनेकदा उघडपणे बोललेत. त्याचं पहिलं प्रेम बहरलं ते लॉस एंजेलिस शहरात. या शहरात त्यांची पहिली नोकरी होती. लॉस एंजेलिसमधील एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होते, तेव्हा त्यांची भेट एका मुलीशी झाली. कालंतराने ते तिच्या प्रेमात पडले. त्यावेळी त्यांनी त्या मुलीशी लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एके दिवशी रतन टाटांना भारतातून फोन आला. त्यांची आजी आजारी असल्यानं त्यांना तातडीने भारतात बोलावण्यात आलं. त्यांनी कुठलाही विचार न करता आपल्या आजारी आजीची काळजी घेण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, टाटा आपल्या नात्याबाबत खूप गंभीर होते आणि त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होतं. त्यामुळं त्यांनी तिला प्रामाणिकपणे एक वचन दिलं होतं की, ते कधीही दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाहीत. नंतर रतन टाटा काही दिवसांना आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पुन्हा लॉस एंजेलिस गेले आणि तिला आपल्यासोबत भारतात घेऊन जाण्याचा विचार करत होते. मात्र, तसं झालं नाही. १९६२ च्या भारत-चीन युद्धामुळे, टाटांच्या प्रेयसीच्या पालकांना आपल्या मुलीली भारतात पाठवणं सोयीचं वाटलं नाही. आणि त्या मुलीच्या घरच्यांनी त्यांना लग्नाची परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांचे नातं तुटले. त्यानंतर रतन टाटा भारतात परत आले. त्यांच्या आजीचं निधन झालं. मात्र, याच दरम्यान त्यांना कळलं की, ते ज्या मुलीवर प्रेम करतात, जिच्याशी त्यांना लग्न करायचं होतं, त्या मुलीनं तिच्या आईवडिलांच्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. हे ऐकून त्यांना धक्का बसला. मात्र, त्याचवेळी त्यांनी ठरवलं की, आपण त्या मुलीला दिलेलं वचन आयुष्यभर पाळायचं आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की आपण दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं नाही. रतन टाटांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केलं होतं. यावेळी मुलाखतकाराने त्यांना विचारलं की, “मुलगी आयुष्यातून गेल्यावरही तुम्ही वचन का पाळले?” त्यावेळी ते म्हणाले, “माणूस गेल्यावरही दिलेलं वचन पाळणं हेच त्या वचनाचं पावित्र्य आहे, असं उत्तर त्यांनी दिलं होतं.
दरम्यान, आज रतन टाटा प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. ते आपल्याला उत्पन्नातील मोठा वाटा दान करतात. त्यांची देशभक्ती, साधेपणा, प्रामाणिकपणा, संयम तसेच ध्येय्यासक्तपणा यांमुळं ते इतर उद्योगपतींपेक्षा वेगळे ठरतात. म्हणूनच देशातील प्रत्येक घटक रतन टाटांबद्दल आदर बाळगून आहे. फक्त उद्योजकच नाही, तर एक माणूस म्हणूनही टाटा जनमाणसात लोकप्रिय आहेत