मुंबई : राज्यात पोलीस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर तुरुंग विभागात अमुलाग्र बदल करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
फडणवीस म्हणाले, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो वाढवण्याच्या दृष्टीनं काय उपायोजना करता येतील तसेच जेल विभागात सुधारणा करणं गरजेचं आहे. सध्या आपल्या जेलमध्ये १,६४१ कैदी असे आहेत ज्यांना जामीन मिळालेला आहे पण जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि व्यक्ती नसल्यानं ते तुरुंगातच आहेत. अशा लोकांना जी काही कायदेशीर मदत करता येईल? त्यांना बाहेर कसं काढता येईल? त्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचा विचार सुरु आहे, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.