मुंबई : सासवड मधील मतदान यंत्राच्या कंट्रोल युनिट चोरी प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission)आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक यंत्रणा व पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला गेला आहे. मतदान यंत्राबद्दल (Voting machine) करण्यात येणाऱ्या कोणत्याही आरोपात तथ्य नाही. समाज माध्यमांवर पुरावा नसताना मतदान यंत्राबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
य़ा घटनेला जबाबदार असलेल्या तीन स्थानिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चोरीच्या या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नागरीक तसेच पक्षाच्या कार्यकर्त्याना देण्यात येणाऱ्या चाचणी (डेमो) मतदान यंत्रांची संख्या त्या जिल्ह्यातील एकूण मतदान यंत्राच्या दहा टक्के आहे. या यंत्राचा वापर झाल्यानंतर त्यांना पुन्हा सुरक्षित ठेवले जाते. ही यंत्रे मुख्य निवडणूक प्रक्रियेत वापरली जात नाहीत, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर; अनिल देशमुखांचा आरोप
सासवड येथे चोरीस गेलेले कंट्रोल युनिट सापडले असून त्यांचे नोंद करुन ठेवलेले कायमस्वरुपी क्रमांक एकच आहेत. हे डेमो यंत्र होते. महाराष्ट्राची बदनामी होणार नाही, याची काळजी निवडणूक विभाग घेत असून ईव्हीएम यंत्रा बद्दल नाहक गैरसमज निर्माण केले जात आहेत. ईव्हीएम यंत्र कोणत्याही प्रकारे तार, इंटरनेट किंवा अन्य कोणत्याही जोडणीद्वारे नियंत्रित केले जाऊ शकत नाही. या यंत्राशी छेडछाड केल्यानंतर ते पुन्हा वापरता येत नाही, असे स्पष्ट करुन देशपांडे यांनी ईव्हीएम यंत्रांबाबतच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे नमूद केले.
ईव्हीएम विषयी अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे मत मांडले आहे. पण या यंत्रांसंदर्भात एकही लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे आलेली नाही, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.