औरंगाबाद : फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनला ७ हजार रुपये भाव होता मात्र नंतर भाव कमी झाले. यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनच्या पिकावर मोठे संकट आले होते. पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. पिकाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा असतानाच सोयाबीनचे भाव आज औरंगाबाद बाजार समितीमध्ये ५ हजार रुपयांवरून ५ हजार ३०० रुपये झाले आहेत. नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे लवकरच सोयाबीनचे भाव ६ हजारापर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोयाबीनला चांगला भाव असतो. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन हे पीक घेतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या किंमती ७ हजारांवर गेल्या होत्या. यामुळे खरीप हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाला प्राधान्य दिलं होतं. एकट्या मराठवाड्यामध्ये २३ लाख ८९ हजार ९६७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये हाताशी आलेल्या सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले. या मध्ये सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं.
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असलेल्या बाजार समिती भाव पुढील प्रमाणे आहेत. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४८००ते ५३०० प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत, कन्नड बाजार समितीमध्ये ४८००ते ५३०० प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत वैजापूर बाजार समितीमध्ये ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल रुपयांपर्यंत तर गंगापूर बाजार समितीमध्ये ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल रुपयांप्रमाणे भाव मिळत आहे.
राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काढणीला आलेली सोयाबीन ओली झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ओली झालेली सोयाबीन बाजारात विक्रीला आणली होती. सोबतच सोयाबीन काळसर पडली होती. दरम्यानच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव कमी झाले होते. मात्र आता शेतकऱ्यांनी सोयाबीन वाळवून नवीन स्वच्छ सोयाबीन बाजारात विक्रीला आणल्यामुळे सोयाबीनला आता चांगले भाव मिळत आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाजारात काळसर आणि ओली सोयाबीन आली होती. यावेळी सोयाबीनचे भाव कमी झाले होते. मात्र, आता नवीन चांगली सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत आहेत. लवकरच सोयाबीनचे भाव ६००० पर्यंत जातील अशी शक्यता आहे, असं व्यापारी कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले.