पाटणा : बीबीसी कार्यालयातील (BBC Office) आयकर सर्वेक्षणावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Bihar Deputy Chief Minister Tejashwi Yadav) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
असे छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला. तेजस्वी यादव म्हणाले, ‘बीबीसीचं काय झालं हे सर्वांना माहीत आहे. गुजरातमध्ये काय झालं हेही सर्वांना माहीत आहे. भाजपला महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे.’
भाजप हिंदू राष्ट्राबद्दल बोलतंय, पण आपली विविधता हेच आपलं सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी जेडीयू नेते सुनील सिंग यांनी बीबीसी कार्यालयात सुरु असलेल्या कारवाईविरोधात केंद्र सरकारला धारेवर धरलं आणि ही कारवाई सूडाच्या राजकारणाचा भाग असल्याचं म्हटलं. ‘बीबीसीवर आयटीच्या छाप्यावरून दिसून येते की केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीसाठी आयकर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे, ‘बीबीसी ही एक प्रेस आहे आणि प्रेस हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ही कारवाई लोकशाहीवर हल्ला असून केंद्र सरकार त्याला जबाबदार आहे, असा आरोपही सुनील सिंग यांनी केला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘देशात प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक राहतात. कोणाला भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनवायचे असेल, तर त्याला देश नष्ट करायचा आहे. भारतात हे शक्य आहे का?, असंही ते म्हणाले.