Kangana Ranaut On Uddhav Thackeray : ‘एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच’; कंगनाची ठाकरेंवर जहरी टीका
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत (Actress Kangana Ranaut) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कंगनाचे मुंबईतील तिचे कार्यालय तोडले होते. या कार्यालयाच्या काही भागाचे अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगत महापालिकेने प्रशासनाने त्यावर हातोडा चालवला होता. दरम्यान, शुक्रवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय दिल्यानंतर स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. आता कंगनाने देखील ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड करत बाहेर पडले आणि भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केले. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्ष चिन्ह आणि पक्ष नाव यांचा वाद निवडणुक आयोगात गेला होता अनेक दिवस निकालाच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी अखेर आयोगाने निकाल दिला आहे. सेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर मूळ शिवसेनेवर हक्क सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिक्कामोर्तब केले. शिवसेना या पक्षनावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केले. ७८ पानी निकालपत्रात आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष सुरु असताना अभिनेत्री कंगना राणावत हीने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.
कुकर्म करने से तो देवताओं के राजा इन्द्र भी स्वर्ग से गिर जाया करते हैं, वो तो सिर्फ़ एक नेता है, जब उसने अन्याय पूर्व मेरा घर तोड़ा था, मैं समझ गई थी, ये शीघ्र ही गिरेगा, देवता अच्छे कर्मों से उठ सकते हैं लेकिन स्त्री का अपमान करने वाले नीच मनुष्य नहीं… ये अब कभी उठ नहीं पाएगा।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 17, 2023
“वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही,” असे टि्वट कंगनाने केले आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि कंगना वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, मागील वर्षी उद्धव ठाकरेंचे सरकार असताना कंगनाच्या घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पाडला होता. त्यावेळीदेखील कंगना उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली होती, “आज माझं घर पाडलं आहे, उद्या तुमचा गर्व मोडून पडेल. प्रत्येकाची वेळ येते…लक्षात असूद्या”.
कंगना राणावत विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद तेव्हा पेटला होता.याची सुरुवात कंगनानं मुंबईची पाकव्याप्त काश्मिरशी केलेल्या तुलनेपासून झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेला तालिबान आणि बाबराची सेना असे म्हटलं होते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.