Zero Budjet Farming । रासायनिक शेतीला विरोध करून झिरो बजेट शेतीचा पुरस्कार करणारे सुभाष पाळेकर आहेत तरी कोण?
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांचा भर झिरो बजेट शेतीवर होता. ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितले. दरम्यान, नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेतीची मूळ संकल्पना मांडणारे कोणी मांडली? याविषयी जाणून घेऊया.
हायलाईट्स
१. झिरो बजेट शेती जनक सुभाष पाळेकर
२. सुभाष पाळेकर हे विदर्भातील बेलोरा गावचे
३. कृषी क्षेत्रातील कार्यामुळे वेगवेगळे पुरस्कार
४ पद्मश्री पुरस्कारानेही पाळेकर सन्मानीत
काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतीमालाचा दर्जा हा खालावलेला आहे. त्यामुळं पुन्हा नैसर्गिक शेतीची संकल्पना समोर येऊ लागली. नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेतीची मूळ संकल्पना सुभाष पाळेकर यांनी मांडली. जमिनीचं आरोग्य धोक्यात, शेतकऱ्याचा जीव धोक्यात, त्यामुळे पाळेकरांचा रासायनिक शेतीला कडाडून विरोध होता. म्हणूनच त्यांनी कमी खर्चाची ‘झिरो बजेट’ शेती करायला सुरुवात केली. ३० वर्षाच्या तपश्चार्या नंतर हे झिरो बजेट शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली. पाळेकर हे विदर्भातील बेलोरा गावचे आहेत. त्यांचे वडीलही शेतकरीच होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाळेकर यांनी नागपूर येथील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सातपुडा भागातील अदिवासी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कामही त्यांनी केले. आदिवासी भागात काम करत असताना त्यांनी आपली जीवनशैली आणि सामाजिक रचना यांचा अभ्यास केला. जंगलातील निसर्गव्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला. १९८६ -८८ या काळात त्यांनी जंगली वनस्पतींचाही अभ्यास केला. नागपूर येथील कृषी विद्यापीठात MSc करत असलेल्या पाळेकरांनी १९७३ साली शिक्षण सोडलं आणि थेट शेतीतल्या प्रयोगाला सुरुवात केली. रासायनिक शेतीला विरोध करणारे पाळेकर १२ वर्षं रासायनिक शेतीच करत होते. बारा वर्षं शेती केल्यानंतर १९८५ नंतर त्यांच्या शेतीचं उत्पादन घटलं, आणि त्याच्या कारणांच्या मुळाशी जायचं त्यांनी ठरवलं. पाळेकर रासायनिक शेती करत होते, तो काळ भारतातल्या हरित क्रांतीचा सुवर्णकाळ होता. दरम्यान, उत्पादन घटल्यामुळे पाळेकर झिरो बजेट शेती कडे वळले. महाविद्यालयात रासायनिक शेतीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कृषी संदर्भातील लेखही वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशित केले आहेत. १९९६- ९८ या काळात पुणे येथील प्रसिद्ध ‘बळीराजा’ मराठी कृषी पत्रिका यांच्या संपादकीय यामध्ये लिखान केले. त्यांनी शेती विषयी मराठी, इंग्रजी आणि हिंदीत अनेक पुस्तके लिहीली. त्यांच्या लिखानाच्या माध्यमातून राजकारणी, शेतकरी यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या खऱ्या समस्याकडे लक्ष वेधले गेले. पाळेकर यांनी हायब्रीड बियाणांचा कमीत कमी वापर करून पारंपरिक बीज वापरून रोपं तयार करण्यावर भर दिला. रसायनविरहित कीटकनाशकं त्यांनी विकसित केली. पाळेकर यांच्या शेतीतल्या अमुल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना २०१५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केलंय.