सत्याग्रह, असहकार, इंग्रजांना विरोध, विदेशी मालावर बहिष्कार या मार्गांनी देशाला स्वातंत्र्य मिळवूण देण्यासाठी अनेक शूरवीरांनी मोठं योगदान दिलंय. त्यांच्या योगदामुळेच गुलामगिरीतीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या काळात जिथे महिलांवर अनेक बंधने लादण्यात यायची तिथे काही शूर महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या महिला आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.
१९४२ सालच्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात गांधींजींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि ‘करेंगे या मरेंगे’चा दिलेला मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. बेगम हजरत महल या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी १८५७ च्या स्वांतंत्र्यलढ्यातील युद्धात मोलाचं योगदान दिलं होतं.
कॅप्टन लक्ष्मी सहगल
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ज्या आझाद हिंद फौजेची स्थापना केली, त्यातील स्त्रियांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी केलं. आझाद हिंद सेनेबरोबर काम करताना लक्ष्मी सहगल यांनी हेच दाखवून दिलं की, अहिंसक मार्गाने होणारे आंदोलन असो किंवा लढाई करण्याची वेळ येवो, महिला कुठेही मागे नाहीत. आझाद हिंद सेनेत जाण्यापूर्वी देखील त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता.
ऍनी बेझंट
भारतीय नसलेल्या पण आयरिश असून देखील ऍनी बेझंट यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिलं. १९१६ मध्ये त्यांनी होमरूलची चळवळ चालू केली. त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य बनल्या आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी ‘न्यू इंडिया’ नावाचे वृत्तपत्र देखील चालवले.
अरूणा असफ अली
अरूणा अली या भारतीय शिक्षिका होत्या. त्यांनी ऑगस्टक्रांती आंदोलनात मोलाची कामगिरी बजावली. या चळवळी अनेक नेत्यांना अटक करण्यात आल्यानंतर या आंदोलनाची कमान अरुणा असफ अली यांनी सांभाळली. ९ ऑगस्टला त्यांनी इंग्रजांना न जुमानता मुंबईच्या गोवालिया टँकवर तिरंगा फडकवला. या घटनेमुळे इंग्रजांनी अरुणा असफ अली यांना पकडून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणी केली. मात्र, इंग्रजांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. याचाच फायदा घेत अरुणा असफ अली भूमिगत झाल्या आणि आंदोलनाला त्यांनी पाठबळ दिलं. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशसेवेची जबाबदारी कायम ठेवली. राष्ट्रसेवासाठी त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून त्यांना ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन इनडिपेंडंस म्हणून ओळखल्या जातं.
राणी लक्ष्मीबाई
राणी लक्ष्मीबाई यांना शौर्याचं प्रतिक मानल्या जातं. आपल्या हिमतीच्या बळावर राणी लक्ष्मीबाईंनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ब्रिटिशांशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्य बळाची कहाणी इतिहासात अजरामर आहे.
उषा मेहता
भारतातील विविध भागात इंग्रजांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनाला जोर आला होतो. अशावेळी उषा मेहता या ‘भारत छोडो’ आंदोलनाला आवाज देण्यासाठी भूमिगत रेडिओ स्टेशन चालवत होत्या. खरंतर उषा मेहता या गांधीजींच्या शिष्या होत्या. १९२७ मध्ये त्यांची गांधीजींसोबत पहिली भेट झाली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. ऑगस्ट क्रांती आंदोलनात त्यांचा मोलाचा वाटा होता. भूमिगत रेडिओद्वारे संदेश पाठवण्याचं काम त्या करत होत्या.