चंदीगड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असलेल्या साठ मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली. हॉस्टेलमधीलच एका विद्यार्थीनं मुलींचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, त्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली. याच निमित्ताने अशा प्रकरणांमध्ये पीडितेचे अधिकार काय असतात? आणि ते कोणती कायदेशीर पावलं उचलू शकतात? याच विषयी जाणून घेऊ.
तुमच्या न कळत कोणी तुमचा व्हिडिओ शुट केला तर तो तुमच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग असतो. गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीचा घटनात्मक अधिकार आहे. जर कोणी तुमचा फोटो किंवा व्हिडिओ शुट करून व्हायलर केला तर तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरतो.
महत्वाच्या बाबी
१. गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार
२. देशात रोज शेकडो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
३. लपून एखाद्याचा फोटो, व्हिडिओ काढणे कायद्याने गुन्हा
४. अंघोळ करतांना महिलेचा फोटो काढल्यास ५ वर्षांच्या तुरुंगवास
तुमचा व्हिडिओ बनवला तर तुम्ही तक्रार करू शकता का?
जर एखाद्या YouTuber ने तुमची वैयक्तिक माहिती पोस्ट केली असेल किंवा तुम्हाला न कळवता तुमचा व्हिडिओ अपलोड केला असेल, तर तुम्ही त्यांना ते काढून टाकण्यास सांगू शकता.
तुम्ही YouTuber पर्यंत पोहोचू शकत नसल्यास, किंवा व्हिडिओ काढून टाकण्यास नकार दिल्यास, तुम्ही YouTube चॅनेलकडे तक्रार करू शकता. या प्रकरणात कायद्याचीही मदत घेतली जाऊ शकते.
तक्रार कुठे करायची?
सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रत्येक शहरात सायबर सेलची स्थापना केली आहे. सोशल मीडियावर सतत मागे लागून त्रास देणे, मॉर्फ केलेला फोटो टाकून बदनामी करणे असे प्रकार मुलींच्या बाबतीत सर्रास होत असतात. अशा वेळी तुम्ही सायबर सेल, सायबर सेल नसेल तर स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवू शकता. एफआयआर नोंदवतांना काही अडचछण आल्या पोलिस आयुक्तांशी संपर्क करा. महिलांच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करू शकता.
तक्रार दाखल करण्यापूर्वी काय करावे?
तक्रार दाखल करण्यापूर्वी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीची ओळख, फेसबूक आयडी, व्हॉट्सअॅप क्रमांक आवश्यक आहे. व्हिडीओ अथवा फोटो व्हायरल केल्याचे स्क्रीन शॉट, ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग असतील तर याचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. संबंधित व्यक्तीचे संदेश, ई-मेल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक चॅटींग हेही सबळ पुरावे मानले जाऊ शकतात.
सध्या प्रत्येकाच्या हातात चांगल्या प्रतीचे कॅमेरे असलेले स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे कुठेही, कधीही, कुणाचेही फोटो काढले जातात. मुलींचे फोटो काढण्याची आणि ते पसरविण्याची विकृती त्यामुळे वाढीस लागली. आपल्या देशात दररोज शेकडो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुलींनादेखील आपल्याला ‘व्हिक्टिम’ बनवले जातेय याची कल्पना नसते. पिकनिक, पार्टीच्या वेळी बेसावध क्षणाचे फोटो काढले जातात. आणि त्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. मात्र, जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते, तेव्हा तुम्ही कायदेशीर पावलं उचलून अशा परिस्थितीला तोंड देऊ शकता.