फटाका नव्हे वाद पेटला: बच्चू कडू यांच्या गावात दिवाळीचा किराणा घेऊन पोहोचले राणा समर्थक, बच्चू कडूंचे कार्यकर्ते संतापले
अमरावती : दिवाळीच्या तोंडावर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि खासदार रवी राणा व आमदार रवी राणा यांच्यामध्ये वाद पेटला आहे. ‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे असे राणा दाम्पत्य आहे’ अशी टीका कडू यांनी केली होती. त्यानंतर आज राणा यांच्या समर्थकांनी बच्चू कडू यांच्या गावात दिवाळीचा किराणा घेऊन पोहोचले.
आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्या दिवाळीच्या किराना वाटपावरून राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली होती. आज आमदार बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावात रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीचा मोफत किराणा वाटला.
यावेळी किराणा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची झुंबड उडाली होती. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून किराणा घेऊन गेले. यावेळी राणा व बच्चू कडू यांचे समर्थक देखील यावेळी आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला होता. वर्षभर दिसले नाही आता दिवाळीच्या तोंडावर आमची थट्टा करू नये’ असं प्रत्युत्तर बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी रवी राणांच्या समर्थकांना दिला.
तर, रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पलटवार करत ‘एक किलो तरी तुम्ही साखर वाटून दाखवा’ असं आव्हान दिलं होतं. मात्र आज राणांच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत बच्चू कडू यांच्या गावात जाऊन थेट किराणा वाटला. त्यामुळे आता नेमकं बच्चू कडू यावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहावे लागणार आहे.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. ”इथून खिसे कापायचे, गोरगरिबांच्या खिशात हात घालायचा, लोकशाहीचे पतन करायचं व राजकारणाची ऐसी की तैशी करायची. खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसंच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडलं होतं.