Shrigonda MIDC : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक परिसरात औद्योगिक वसाहतीला (Shrigonda MIDC) तत्त्वतः मंजुरी मिळाली असून त्यासाठी तेथील शेती महामंडळाची ६१८ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी देण्याचा निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती खा. सुजय विखे (MP Sujay Vikhe) आणि आ. बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिली.
याबाबत बोलताना पाचपुते म्हणाले, तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्याची जुनी मागणी होती. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यात बाधा येत होती. त्यामुळे शेती महामंडळाची जमीन औद्योगिक वसाहतीसाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार आज (दि. ६) बैठक झाली. या बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, महसूलविभागाचे अप्पर सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने आदी उपस्थित होते.
भारतातील विवाह संस्था टिकली पाहिजे, आपला देश पाश्चिमात्य नाही; SC ने स्पष्ट केली भूमिका
या बैठकीत तालुक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पवंतवाडी आणि महादेववाडी येथील ६१८ एकर जमीन उद्योग विभागाला देण्याचा निर्णय झाला. लवकरच वसाहतीच्या पहिल्या टण्याचे काम सुरू होईल.
खा. डॉ. विखे म्हणाले, बेलवंडीमध्ये रस्ते वाहतूक, पाणी तसेच रेल्वे वाहतुक सुविधा उपलब्ध तर आहेतच. शिवाय शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी वसाहत उद्योजकांना मोठी पर्वणी ठरणार आहे. या एमआयडीसीमुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे काल मर्यादेत करण्यात यावीत, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी अधिकारांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात मोजणीचा अहवाल मागविण्यात आला आहे. पुढील प्रकियेस गती देण्यात येणार असून, तत्काळ हे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठकीत दिली. तसेच जिल्हाधिकारी यांनी आजच उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एमआयडीसी करिता खा. डॉ. विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता. उद्योगनगरीसाठी जमीन दिल्यानं खासदार विखेंनी मंत्री राधाकृष्ण विखे आणि मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.