‘आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण मोदी-शहांना शिव्या सहन करू शकत नाही’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने धुरळा
महाविकास आघाडीची राजवट असताना सरकार कोसळण्याच्या सातत्याने नवनव्या तारखा जाहीर करणारे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आता एक नवा गौप्यस्फोट केला. राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होते, असं खुद्द चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळं अनेकांच्या भूवया उंचावल्या.
महत्वाच्या बाबी
१. शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून – चंद्रकांत पाटील
२. पाटलांच्या सेना फोडण्याच्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या
३. ‘आई – वडिलांना शिव्या द्या, पण मोदी – शहांना शिव्या देऊ नका’
४. चंद्रकांत पाटली यांच्या वक्तव्याची राजकीय रंगली मोठी चर्चा
सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं. सध्या सगळीकडे निवडणूकांचं वारं घुमू लागलंय. तसंच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला.
ठाकरे सरकारच्या काळात सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. त्यांनी अनेकदा याविषयी भविष्यवाणी केली होती. मात्र, संबंधित तारखांना ठाकरे सरकार न पडल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून त्यांची कायम खिल्ली उडवली जायची. मात्र तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले. शिंदे यांनी महाविकास आघाडीचे ५० आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची सरकार पडण्याची भविष्यवाणी उशीरा का होईना, खरी ठरल्याचे म्हणायला हरकत नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य करून, गेली अडीच वर्ष उभ्या महाराष्ट्रात जो तमाशाचा फड उभा केला होता त्यामागे जनतेची काळजी नव्हती तर यांच्या सत्ता हातून गेली, याची वेदना होती, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
दुसरं म्हणजे, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आणखी एका विधानाची सध्या चर्चा रंगतेय. त्यांनी आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण मोदी शाहांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं वक्तव्य केलं. पाटील यांनी कार्यक्रमात बोलतांना हातकणंगले मतदारसंघातल्या निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपांचा उल्लेख केला. चंद्रकांत पाटलांनी आपल्याला संपवल्यांची भाषा केलीय, अशी खंत राजू शेट्टी यांनी एका केंद्रीय नेत्यापुढे केली होती. ते पुढे म्हणाले होते की, तुम्ही चंद्रकांत पाटलांना आई -वडिलांवरून शिव्या द्या त्यांना काही वाटणार नाही. मात्र, मोदी आणि शहांना काही बोलल्याचे त्यांना चालणार नाही. हा किस्सा पुण्यातील त्याचं सत्कार समारंभात चंद्रकांत पाटीलांनी सांगितला. त्यामुळं पाटलांनी एकप्रकारे तुम्ही आई-वडिलांना शिवा द्या, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही बोलू नका, असा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, मोदींना शहांना खूश करण्यासाठीच चंद्रकांत पाटील असं वक्तव्य करत चाटूगिरी करत असल्याचं बोलल्या जातं. मात्र, देशात ९५,% लोकांचा असा एकही दिवस जात. नाही ज्या दिवशी ते मोदींना-शिवी देत नाहीत. खरंतर आई वडिलांना शिव्या देणं, ही महाराष्ट्राचीच संस्कृती नाही, आणि याच संस्कृतीचा पाटलांना विसर पडत चालल्याचं दिसतं. कारण, एखादा म्हटला असता मला शिव्या द्या, पण आई वडिलांना नको. पण इथे गंगा उलटी वाहत असल्याचं चित्र आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळं भाजप हा दिवसेंदिवस असंस्कृत आणि असभ्य नेत्यांचा पक्ष होत चाललाय कि काय, अशी शंका उपस्थित होते. शिवाय, आईवडिलांना शिव्या द्या, असं बेताल वक्तव्य करून ज्या जन्मदात्या आई वडीलांचे चंद्रकांत पाटील होऊ शकते नाही, ते जनतेचं काय होणार? कारण, जन्मदात्या पेक्षाही सत्तादाता चंद्रकांत पाटलांना मोठे वाटायला लागले. त्यामुळं चंद्रकांत पाटलांनी आईवडिलांचे चांगलेच पांग फेडल्याची टीकाही चंद्रकांत पाटलांवर नेटकऱ्यांकडून होतेय. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.