बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारला या वर्षी बॉक्स ऑफिसवर जादू करता आलेली नाही. या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली आहे. ‘बच्चन पांडे’पासून सुरू झालेला हा फ्लॉप चित्रपटांचा प्रवास ‘राम सेतू’ला नंतरही संपलेला नाही. ‘राम सेतू’ चित्रपटगृहांमध्ये अजूनही असला तरी त्याचा प्रेक्षक दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्याचाही समावेश फ्लॉपच्या यादीत होणार आहे. बॉलीवूडमधील अक्षयच्या चित्रपटांचा आलेख सातत्याने घसरत आहे. तरीही आता अक्षय आणखी एका इंडस्ट्रीत नशीब आजमावण्यासाठी निघाला आहे. अक्षयने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची घोषणा केली आहे.
चित्रपट फ्लॉप होत असतानाही अक्षय कुमार एकामागोमाग एक चित्रपट साइन करत आहे. खिलाडी कुमार नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करत असतो. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये महाराजांची भूमिका साकारल्यानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा अशीच भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमार महेश मांजरेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटातून मराठी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि वसीम कुरेशी निर्मित, हा चित्रपट सात शूर योद्ध्यांच्या कथेवर आधारित आहे. ज्यांचे एकमेव उद्दिष्ट शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करणे हे होते. इतिहासाच्या गौरवशाली पानांवर या वीरांची कथा लिहिली गेली आहे.
मुंबईत झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त शॉट कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. अक्षयचा या वर्षातील पाचवा चित्रपट ‘राम सेतू’ रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी ही घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
@manjrekarmahesh दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाचा मुहूर्त सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @RajThackeray हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. याप्रसंगी सिनेमाच्या संपूर्ण टीमशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/FRCWMWa6OX
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 2, 2022
या चित्रपटाविषयी आणि त्याच्या मराठी सृष्टीत पदार्पणाबद्दल बोलताना अक्षय या कार्यक्रमात म्हणाला, “हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारणे ही एक मोठी जबाबदारी आहे असे मला वाटते. राज सरांनी मला ही भूमिका करायला सांगितल्यावर मला धक्काच बसला. ही भूमिका साकारताना मला खूप छान वाटत आहे आणि हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. इतकंच नाही तर महेश मांजरेकर यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम करणार आहे आणि हा माझ्यासाठी एक अनुभव असणार आहे.”