नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. ३८ जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक गुड्डू यांनी दिली आहे.