Just another WordPress site

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील ‘हेच’ पाच जिल्हे का निवडले? या जिल्ह्यांचं राजकीय महत्व काय?

कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली. सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ही यात्रा पोहोचली. मराठवाड्यातून प्रवेश करुन विदर्भमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून ही यात्रा जातेय. दरम्यान, राहुल गांधींनी त्यांच्या भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातला हाच मार्ग का निवडला? या पाच जिल्ह्यातूनच ही यात्रा का जातेय? महाराष्ट्रातील या मार्गाचं राजकीय महत्वं काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल
२. विदर्भमार्गे राहुल यांची यात्रा पुढे मध्यप्रदेशात जाणार
३. राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील यात्रेला राजकीय महत्व
४. काँग्रेसला उभारी देण्याची गरज म्हणून निवडला खास मार्ग

 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला दोन महिने पूर्ण होत आहेत. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेडच्या देगलुरमध्ये भारत जोडोचं आगमन झालं. राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील यात्रेचे राजकीय महत्व मोठे आहे. मराठवाडा आणि विदर्भाची निवड यामागे मोठे राजकीय गणित आहे. ज्या जिल्ह्यातून यात्रा जात आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्याचा समावेश आहे. हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. ते आणखी मजबूत करणे आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भातून अधीक खासदार पदरात पाडून घेण्याची रणनिती आहे. यात्रा राजकीय नाही, असे काँग्रेस नेते सांगत असले तरी २०२४ च्या लोकसभेची तयारी साठीच यात्रा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कारण, महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण जागा ४८ आहेत. त्यामध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार हा विदर्भातील आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला, तर २८८ पैकी ४४ जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत. त्यात तब्बल २३ आमदार हे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या मराठवाडा आणि विदर्भातून जातेय त्या विभागातले आहेत. त्यामुळं ही राहूल यांनी भारत जोडोसाठी हा मार्ग निवडल्याचं बोलल्या जातं.

दुसरं म्हणजे, महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भानं ७ मुख्यमंत्री राज्याला दिले, जे काँग्रेसमधले आहेत. एकीकडे काँग्रेस संपली असा दावा वारंवार होत असताना, या दोन विभागात काँग्रेसचं अस्तित्व अजूनही आहे. हे खरं असलं तरी या दोन्ही विभागात काँग्रेस काही प्रमाणात कमकुवत झाली आहे. कारण २००९ ला या फक्त दोन्ही विभागातून काँग्रेसचे तब्बल ४२ आमदार निवडून आले होते. २०१४ च्या मोदी लाटेपासून जी काँग्रेसची ताकद कमी झालेली दिसते ती भरून काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी भारत जोडोसाठी हा मार्ग निवडल्याची चर्चा आहे.

आता आणखी एक प्रश्न म्हणजे राहुल गांधींनी देगलूरमधूनच महाराष्ट्रात प्रवेश करायचं का ठरवलं? तर नांदेड हा आधीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. २०१४ ला देशात सर्वत्र मोदी लाट असताना अशोक चव्हाणांनी नांदेडात काँग्रेसचा झेंडा झडाकावत ठेवला.
मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणांचा पराभव झाला. त्यामुळे इथे काँग्रेसला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी देगलूरमार्गे प्रवेश करून नांदेडमध्ये सभा घेण्याचं ठरवलंय असावं, असं म्हटलं जातंय. ही यात्रा नांदेडनंतर, हिंगोली जिल्ह्यात जाणार आहे. हिंगोलीतही काँग्रेसला मोठी संधी आहे. राजीव सातव हिंगोलीतून २०१४ ला खासदार झाले होते. तसेच मराठवाड्यातील लातुर जिल्हाही काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मानणारा वर्ग मोठा आहे. मराठवाड्यातून राहुल गांधी यांची यात्रा जाणार असल्याने लातुरला देखली त्याचा फायदा होऊ शकतो.

मराठवाड्यातून ही यात्रा विदर्भात जाणार आहे. विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचा राज्यातला इतिहास बघितला, तर विदर्भात काँग्रेसचा प्रभाव जास्त राहिलेला आहे. अगदी काँग्रेसच्या स्थापनेपासून विदर्भानं काँग्रेसला भरभरून मत रुपी पाठिंबा दिलाय. संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवारही विदर्भाचे होते. आता २०१४ चा अपवाद वगळता विदर्भ नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भारतात काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. महाराष्ट्रासारखे मोठे राज्य काँग्रेसनं गमावलं होतं. त्यातही विदर्भानं काँग्रेसची लाज राखली. महाराष्ट्रातून काँग्रेसला बाळू धानोरकर यांच्या स्वरुपात एक खासदार मिळाला आणि तोही विदर्भाचा. विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, विदर्भातून तब्बल ६२ आमदार विधानसभेवर निवडून जातात. मात्र, आता काँग्रेसची ही ताकद कमी होताना दिसत आहे. सध्या विदर्भातून काँग्रेसचे १५ आमदार आहेत. त्यामुळे येथे पक्षाला उभारी देण्याची गरज आहे. येथे काँग्रेसला थोडेसे जरी बळ मिळाले तरी महाराष्ट्रात पक्षाला चांगले दिवस येतील या आशेने या जिल्ह्यांचा भारत जोडो साठी विचार झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

दरम्यान, राहुल गांधींच्या यात्रेमुळे काँग्रेसचे बालेकिल्ले परत मिळवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यात्रेला सध्यातरी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधींच्या यात्रेमुळे आता हे काँग्रेसचे बालेकिल्ले त्यांना परत मिळतील का? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जो काँग्रेसचा सुफडासाफ झाला होता, तो भरून काढण्यात काँग्रेसला यश येईल का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!