देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला तब्बल २४ वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला. मल्लिकार्जुन खर्गे हे शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव करत काँग्रेसचे ‘सरसेनापती’ झाले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी ९ हजार ८०० जणांनी मतदान केले होते. खर्गे यांना ७ हजार ८९७ मते पडली. तर विरोधी शशी थरुर यांना १०७२ हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या समोर आगामी काळात नेमकी काय आव्हाने आहेत? याच विषयी जाणून घेऊ.
महत्वाच्या बाबी
१. काँग्रेसला २४ वर्षांनी मिळाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष
२. मल्लिकार्जुन खर्गे झाले आता काँग्रेसचे ‘सरसेनापती’
३. आगामी काळात सत्ताकाबीज करणं हे खर्गें समोर आव्हान
४. मल्लिकार्जुन खर्गे हे कॉंग्रेसला उभारी देतील का?
देशपातळीवर आज सर्वात जास्त चर्चेतला मुद्दा राहिला तो काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद निवडणुकीचा. या निवडणुकीचा निकाल आज लागला. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने अनेक वर्षांनी कॉंग्रेसला गांधी कुटुंबाबाहेर अध्यक्ष मिळाला.
आता खर्गे यांच्यासमोर पक्षाला उभारी देण्याचे मोठे आहे. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागत आहे. राजस्थान आणि छत्तीसगड वगळता इतर मोठ्या राज्यात स्वबळावर सत्ता नाही. त्यामुळे काँग्रेसला नवचैतन्य देण्याचे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे. अशातच अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणुक जाहीर झाली. ही विधानसभा १२ नोव्हेंबरला पार पडेल. सध्या राज्यात भाजपचे सरकार असून अनेक पोल्सच्या अंदाजानुसार ही निवडणूक चुरशीची होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा ह्या दोन्ही निवडणुका आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. दोन वर्षानंतर देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. खरंतर देशात सर्वाधिक काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम कॉंग्रेसने केलाय. मात्र गेल्या ८ वर्षापासून देशात भाजपची सत्ता आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करून सत्ताकाबीज करणं हे खर्गे समोरचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने खर्गे यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यासाठी भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणणे आणि त्यांची मोट बांधण्याची जबाबदारी आता खर्गे यांच्या खांद्यावर आली.
महत्वाचं म्हणजे, गेल्या ८ वर्षात काँग्रेसचा परंपरागत मतदार बदलेला आहे. नव्या पिढीने भाजपला कौल दिला होता. त्यामुळे पक्षाला आपले कुठे चुकले याचे चिंतन करून कॉंग्रेसला उभारी देणं हे खर्गे समोरचं आणखी एक मोठं आव्हान असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. केंद्रात संघ विचारांची सत्ता आल्यास राज्यघटना धोक्यात येते, असं सातत्यानं बोलल्या जातं. यापूर्वीही शिक्षण असो वा अन्य संस्था, सर्वाच्या भगवीकरणाचे प्रयत्न झाले. तेव्हा देशभरातून झालेल्या विरोधामुळे तत्कालीन राज्यकर्त्यांचे मनसुबे उधळले गेले. आताही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. देशात विघटनवादी शक्ती फोफावल्या आहेत. द्वेष, जातीय तेढ आणि चुकीच्या माहितीचा प्रसार करून जाती-जाती, धर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न मोठ्या शिताफीने सुरू आहेत. सामाजिक अस्थिरता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जात असताना देशासमोरील इतर ज्वलंत प्रश्न मात्र मागे पडले आहेत. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसमोरील संकटाचा विचार करण्याऐवजी काँग्रेसला बदनाम करून समाजात भय निर्माण केले जात आहे. त्यामुळं खर्गे यांच्यापुढं विघटनवादी शक्तींविरोधातील लढ्याचं नेतृत्व करणं हे मोठं आव्हान आहे. भारत हा तरुण देश आहे. या देशातील तरुणांना आपले नेतृत्वही आपल्याप्रमाणेच तरुण असावे, असे वाटते. आपला नेता नवी आशा निर्माण करणारा, नव्या संधी देणारा असावा, असे वाटते. देशातील ५२ टक्के तरुण २५-३० वयोगटातील आहेत. ते काँग्रेसपासून दूर का गेले होते, याचा विचार करून ‘मोदी जाल’मधून देशाला मुक्ती मिळवून देणं ही आव्हान खर्गेंना पेलायचं आहे. हे आव्हानं ते कसे पेलतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.