मुंबई : शिवसेनेत दोन गट झाल्याने मागच्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटात आणि शिंदे गटात शिवसैनिकांचे इनकमिंग सुरू आहे. दरम्यान दोन्ही गटातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान ठाकरे गटाला दुपारी पाठींबा देऊन रात्री शिंदे गटात सामिल झाल्याच्या घटना घडल्याने ठाकरे गटाला जोरदार धक्के बसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्ये केल्याने त्या कोणत्या नवीन गटात सामील होणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या दिपाली सय्यद मागच्या काही दिवसांपासून अचानक शांत झाल्याचे दिसून येत आहे. सय्यद ह्या विरोधकांवर जाहीर टीका करत असल्याने त्यांच्यावर टीका व्हायच्या यामुळे त्या नेहमी सक्रीय शिवसेनेची बाजू मांडायच्या यावर त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या कि, ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली,” असल्याचे त्या म्हणाल्या. मागच्या काही महिन्यांपूर्वी सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्या शांत झाल्याचे दिसून येत आहेत.
याचबरोबर मागच्या काही काळापासून तुम्ही शांत दिसत आहात यावर का सांगाल म्हणताच, सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपले अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात. असे त्या म्हणाल्या यावरून त्यांचा अप्रत्यक्ष कोणावर रोष आहे हे दिसून येत आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होते. एकत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे. जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवतं, असेही त्या म्हणाल्या.