जेव्हा जेव्हा वातावरणात बदल व्हायला लागतात, तेव्हा अनेकांना सर्दी पडशाची तक्रार सुरु होते. काहीजणांना खोकलाही येऊ लागतो. गेल्या काही वर्षांपासून वाढणाऱ्या प्रदूषणामुळे यात भरच पडली आहे. अगोदर सर्दी सात दिवसांत बरी होत असे. मात्र आताशा अनेकांना दहा-बारा दिवस त्याचा त्रास होत असल्याचं दिसतं. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये ग्रिफिथ विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या निष्कर्षानुसार, जे लोक आपल्या नाकाची नीट साफसफाई करत नाहीत, त्यांना मेंदूशी संबंधित अनेक विकार जडत असल्याचं दिसून आलं आहे. त्यात अल्झायमर आणि डिमेंशिया या आजारांचाही संबंध असल्याचं दिसून आलं आहे.
लाखो पीडितांचे अनुभव
या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, युकेमध्ये ६५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अनेकांना अल्झायमर आणि डिमेंशिया या आजारांचा त्रास होऊ लागला आहे. एकट्या युकेत अशा लोकांची संख्या ४२ हजारांपेक्षा अधिक आहे. तर ८० पेक्षा अधिक वय असणाऱ्या दर ६ लोकांपैकी एकजण यातील कुठल्या ना कुठल्या आजाराचा रुग्ण असल्याचंही दिसून आलं आहे. युकेत सर्व वयोगटातील सर्व रुग्णांचा विचार करता हा आकडा साडेआठ लाखांच्याही वर जात असल्याचं दिसून आलं आहे.
नाकातील केसांबाबत धक्कादायक निष्कर्ष
गेल्या काही वर्षांपासून फॅशनचा भाग म्हणून नाकातील केस कापण्याचा ट्रेंड रुढ झाला आहे. अनेकजण वॅक्स करून नाकातील केस काढून टाकतात. मात्र याचा दुष्परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होत असल्याचं दिसून आलं आहे. नाकातील केस हे श्वासावाटे येणारे धुळीचे कण आणि बॅक्टेरिया अडवण्याचा काम करत असतात. त्यामुळे अधिकाधिक शुद्ध स्वरुपातील ऑक्सिजन शरीर आणि मेंदूत पोहोचवला जातो. त्यानंतर जेव्हा आपण श्वास सोडतो, त्यावाटे हे धुलीकण आणि विषाणू बाहेर फेकले जातात. मात्र नाकातील केस वॅक्स करून काढून टाकल्यामुळे एक नैसर्गिक फिल्टरच कमी होतो. त्यामुळे अनेक धुलीकण आणि विषाणू थेट श्वसनसंस्थेत प्रवेश करतात आणि मेंदूत जातात. त्यामुळे मेंदूशी संबंधित अनेक विकारांना आमंत्रण मिळण्यााची शक्यता निर्माण होते.
नाक करा साफ
अनेकांना वर्षानुवर्षे आपलं नाक साफ करण्याची सवय नसते. त्यामुळे नाकात अडकून पडणारे अनेक अनावश्यक घटक श्वसनसंस्थेत जाऊन त्यातील काही मेंदूत जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी वेळोवेळी नाकाची सफाई करणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जातो. अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या आजारात माणसांना विस्मरणाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे स्मरणशक्तीदेखील कमी होते.