भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी (Bhima Koregaon Violence Case) अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) आज (शुक्रवार) त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना २०२० पासून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
एप्रिल २०२० मध्ये तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. आनंद तेलतुंबडे सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात (Taloja Jail) आहेत. विशेष न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्थित नव्हते आणि त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषणही केली नाहीत, असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
१ जानेवारीला भीमा-कोरेगाव लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंसाचार उसळला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला असून १० पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. भीमा-कोरेगाव संघर्षानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान पोलिसांनी १६२ जणांवर ५८ गुन्हे दाखल केले होते. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात ८२ वर्षीय समाजसेवक पी वरावरा राव यांना जामीन मंजूर केला होता. सुप्रीम कोर्टानं गुरुवारी अंतरिम आदेशात भीमा कोरेगाव येथील आणखी एक आरोपी गौतम नवलखा यांना त्यांची प्रकृती आणि वृद्धत्व लक्षात घेऊन एक महिन्यासाठी नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली.