राज्य सरकारने महाराष्ट्रात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. यामध्ये संचारबंदीसोबतच इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांमध्ये आता अजून वाढ करण्यात आली असून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषत: सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्येच किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हाईलाईट्स
१. महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध अधिकच कडक
२. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर निर्बंध
३. सकाळी ८ ते ११ वेळेतच सुरू राहणार किराणा दुकानं
४. आजपासून १ मेपर्यंत लागू राहणार नवीन नियम
महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत नवे निर्बंध लागू करून जवळपास सात दिवस पूर्ण होत आहेत. तरीही रूग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात नवे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. आजच सरकारने यासंदर्भातली घोषणा केली आहे. २० एप्रिल म्हणजेच आजपासून रात्री ८ वाजल्यापासून १ मेच्या सकाळी ७ पर्यंत हे नवे नियम असणार आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?
किराणा मालाची दुकानं, भाजीपाला विक्री, फळ विक्री, डेअरी, बेकरी, खाद्य पदार्थ विकणारी सगळी दुकानं ज्यामध्ये मटण, चिकन, अंडी, मासे विक्री केंद्राचाही समावेश आहे तसंच कृषीशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांचं खाद्य मिळणारी दुकानं ही सगळी दुकानं सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच खुली राहणार आहेत. यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय इतरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.
सगळ्या दुकांनाना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. मात्र कोरोनाची स्थिती पाहून त्यासंदर्भातला निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे
आपत्कालीन व्यवस्था विभागाला या नियमांमध्ये आणखी काही नियमांची भर घालायची असेल तर ते घालू शकतात अशीही बाब या आदेशात नमूद करण्यात आली आहे.
या आधी १३ एप्रिलला जो आदेश काढण्यात आला होता. त्यातले सर्व नियमही तसेच लागू असतील त्यापैकी कोणत्याही नियमांना शिथीलता देण्यात आलेली नाही.
दारूची दुकानं पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
रिक्षा, टॅक्सी सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच उपलब्ध होणार.
मेडिकल सेवा पूर्ण वेळ सुरू राहणार आहे त्या वेळेवर काहीही निर्बंध नाहीत.