महाराष्ट्रात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेमुळं परिस्थिती अत्यंत भयंकर झाली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या यामुळे राज्य सरकारसमोर मोठं संकट निर्माण झालं. आत्ताच अनेक जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचं दिसून येतं. तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याचा तुटवडा तर गेल्या अनेक दिवसांपासून जाणवतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात कधीही कठोर लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. मात्र हा लॉकडाऊन कधी होणार? हाच प्रश्न महाराष्ट्रातील नागरिकांकडून सातत्याने विचारला जातो. त्यामुळं लॉकडाऊनसंबधित अनेक प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात उद्यापासून लॉकडाऊन होणार का?
महाराष्ट्रात उद्या म्हणजेच 14 एप्रिल पासून लॉकडाऊन लागू केल्या जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कोणतेही पूर्वकल्पना दिल्याशिवाय सरकार राज्यात लॉकडाऊन करणार नाही. असं स्वत: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला पूर्वकल्पना आणि पुरेसा वेळ देऊनच लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती देखील टोपेंनी दिली आहे. तसंच १४ एप्रिलला लॉकडाऊन होणार नसल्याचंही कालच म्हणजेच सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. ‘१४ एप्रिल हा महत्त्वाचा दिवस असल्याने तो जाऊ द्यावा लागेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वत: लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील.’ असंही त्यांनी बोलतांना म्हटलं होतं. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याआधी अनेकदा मत व्यक्त केलं होतं की, अचानक लॉकडाऊन करणं किंवा अनलॉक करणं या दोन्ही गोष्टी धोक्याच्याच आहेत. त्यामुळे जर महाराष्ट्र सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेत असलं तरीही तो तात्काळ लागू केला जाणार नाही अशी शक्यता अधिक आहे.
लॉकडाऊन झाला तर तो किती दिवसाचा असेल?
लॉकडाऊनबाबत सोशल मीडियातून लॉकडाऊन संबंधी बरेच प्रश्न विचारले जात आहेत त्यापैकी हा प्रश्न देखील विचारला जातो की, लॉकडाऊन किती दिवस असणार. खरं तर सरकारमध्ये याच प्रश्नावरुन बरीच खलबतं सुरु आहेत. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या मते लॉकडाऊन हा ८ दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये. तर राज्यातील टास्क फोर्सच्या मते १४ दिवसांचा लॉकडाऊन केला तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटू शकेल. यामुळे आता नेमका किती दिवसांचा लॉकडाऊन घ्यायचा याविषयी नेमका निर्णय हा स्वत: मुख्यमंत्र्यांनाच घ्यावा लागणार आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकल ट्रेन सुरु असतील का?
लॉकडाऊनमध्ये लोक ट्रेन सुरु असणार का असा प्रश्न अनेकांना पडतोय. कारण विशेषत: मुंबईत लोकल ट्रेनवर बरंच काही अवलंबून आहे. राज्य सरकारने अनलॉक केल्यानंतर मर्यादीत वेळ देत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा दिली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा लोकल ट्रेन बंद झाल्या तर मुंबईकरांच्या प्रवासावर बऱ्याच मर्यादा येणार आहे. तूर्तास तरी लोकल ट्रेन या सुरु आहेत. मात्र, सरकारने याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही. काही जणांच्या मते, मुंबईतील लोकल ही सरसकट बंद केली जाणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची परवानगी दिली जाऊ शकते.
लॉकडाऊन केल्यास जिल्हाच्या सीमा देखील सील केल्या जाणार का?
पहिल्या लॉकडाऊनमध्ये राज्यातील जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. त्यावेळी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक होती. त्यामुळे आता देखील लॉकडाऊन झाल्यास तसेच नियम असणार आहेत का? असा प्रश्नही अनेकांना पडला. राज्यात पुन्हा कठोर लॉकडाऊन झाल्यास पूर्वीप्रमाणेच नियम लागू होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी फक्त अत्यावश्यक कामासाठी खासगी वाहनाने प्रवास करण्यास परवानगी मिळू शकते. पण त्यासाठी ई-पास हा नियम लागू असू शकतो. जेव्हा लॉकडाऊनबाबतची सविस्तर गाइडलाइन जारी केली जाईल तेव्हा याविषयी अधिक स्पष्टपणे समजू शकेल
लॉकडाऊनमध्ये काय-काय सुरु असणार?
लॉकडाऊनमध्ये काय-काय सुरु असणार असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. खरं तर लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सगळी आस्थापने बंद केली जातात. यावेळी जर लॉकडाऊन झाला तर तेव्हा देखील तसेच नियम लागू असतील. यावेळी भाजीपाला, डेअरी, वैद्यकीय सेवा आणि त्याच्याशी निगडित गोष्टी तसेच शेती विषयक कामं सुरु राहतील.
लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी होईल का?
लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी होईल का असं देखील काही जण विचारत आहेत. लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी होण्यास बरीच मदत होऊ शकते. कारण लॉकडाऊन केल्यानंतर बाधित रुग्ण हे इतरांच्या संपर्कात येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी होतं. तसंच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांचा वेळ महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे रुग्ण संख्या नक्कीच कमी होऊ शकते.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही वेळापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच लॉकडाऊनचा निर्णय घेतील असं म्हटलं होतं. त्यामुळं लॉकडाऊनचा निर्णय जर आज झाला तर तो कधीपासून लागू केला जाईल, नागरिकांना सामान खरेदी करण्यासाठी अगोदर सुट दिली जाईल का? हे सुद्धा पाहणं तितकच गरजेचं आहे.