Just another WordPress site

Vidhan Parishad : विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं, पाहा, कोणाला मिळणार पुन्हा संधी अन् कोणाला डिच्चू?

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलचं तापलं.  राज्यात राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असतांनाच आता विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं. काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.  विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आलं असून २० जूनला या १०  जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून  देण्यात आली.



हायलाईट्स

१. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं

२. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक

३. भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा

४. दिवाकर रावतेंना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता धूसर


राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहेत.  एकूण १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर,  विनायक मेटे,  प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यासह १० जागांसाठी निवडणूक होणार आहे.  त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला डिच्चू?  याची उत्सुकता शिगेला पोहोचली. प्रवीण दरेकर हे भाजपकडून विधान परिषदेवर आहेत आणि सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून आणखी एक लढणारा आक्रमक चेहरा म्हणजे सदाभाऊ खोत, त्यांचाही कार्यकाळ आता संपत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला.  त्यामुळे सदाभाऊ खोत यांनाही पुन्हा संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. याशिवाय, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा जोरदार पराभव केला. तेव्हापासून पंकजा मुंडे पक्षात एकट्या पडल्याचं चित्र आहे. मागील दसरा मेळाव्यात त्यांनी स्वपक्षीयांवर टीकेचे बाण सोडून मनातला राग व्यक्त केला. नंतर काही दिवसांत त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. आणि त्या पक्षात पुन्हा सक्रिय झाल्या. पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत देखील पंकजांनी पक्षाने सांगेल तिथे जाऊन प्रचार केला. अशात ओबीसींचं राजकीय आरक्षण कोर्टाने सध्या संपुष्टात आल्यानंतर सरकारला अडचणीत आणणारा ओबीसी चेहरा म्हणून पंकजांकडे भाजप पाहू लागलं. ओबीसींच्या मुद्द्यावर सरकारविरोधात रोष निर्माण करायचा असेल तर पंकजा ती भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात, त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करु शकतो, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्ती केली. गेल्या काही काळात त्यांचा पक्षातला अॅक्टिव्हनेस चांगलाच वाढला. त्यामुळं भाजपने जर विनायक मेटे यांना डिच्चू दिला तर पंकजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं.  मातोश्रीचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, मात्र दिवाकर रावतेंना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे. रामराजे नाईक-निंबळकर हे सध्या विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकरांचं तिकीट कन्फर्म मानलं जातं.   तर दुसरी जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान,  पुढील महिन्यात १० जागांसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कुणाला उमेदवारी मिळणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!