केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो. कोरोनातून सावरत असताना आगामी वर्षासाठी सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महागणार असा प्रश्न सामान्य लोकांमध्ये असतो. दरम्यान, अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना नेमका कोणता दिलासा मिळणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महागणार? या विषयी जाणून घेऊ.
हायलाईट्स
१. कपडे, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होणार
२. बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही
३. आयात होणाऱ्या वस्तूंसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार
४. अर्थसंकल्पात इंधन स्वस्त होण्याचेही मिळाले संकेत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. तब्बल दोन तासाच्या या भाषणात त्यांनी अनेक घोषणा करतानाच देशाच्या विकासाचा रोडमॅपच मांडला. सीतारामन यांनी महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला. मोबाईल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आलं. त्यामुळे मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. तसेच देशात निर्माण होणारे मोबाईलही स्वस्त होणार आहेत. दरम्यान, यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशा आली आहे. तर दुसऱ्या बाजुला देशात डिजिटल चलन आणण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
कपडे,
चामड्याच्या वस्तू,
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू,
इम्पोर्टेड केमिकल
मोबाईल फोन, चार्जर
या वस्तू स्वस्त होणार आहेत
काय महागणार?
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक
छत्र्या महाग होणार
आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार