देशाच्या स्वातंत्र्य काळापासूनच राजकारणात गांधी- नेहरू घराण्याचं वर्चस्व आहे. आजही गांधी घराणं राजकारणात आहे. या कुटुंबांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांमध्ये सहभाग असतो. गांधी घराण्यातील आपल्या वादग्रस्त निर्णयांमुळे सतत चर्चेत राहिले ते, संजय गांधी. त्यांनी कोणतेही मोठे संवैधानिक पद भूषवले नाही. मात्र, देशाच्या राजकीय इतिहासात त्यांची निश्चितच मोठी भूमिका होती. आज संजय गांधी यांचा वाढदिवस. एकेकाळी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाणारे संजय गांधी वादग्रस्त का ठरले? याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.
हायलाईट्स
१. संजय गांधी यांचा जन्म १९४६ साली झाला
२. संजय यांना खेळ आणि विमानांमध्ये होता रस
३. त्यांनी कठोर कायद्यांची अंमलबजावणी केली
४. इंदिराजींच्या सल्लागाराची भूमिका बजावली
संजय गांधी यांचा जन्म १४ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली येथे झाला. ते इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे दुसरे पुत्र. त्यांना अभ्यास, वाचन यांसारख्या शैक्षणिक गोष्टींमद्धे अजिबात रस नसायचा. हे सगळं माहिती असूनही त्यांच्या आई वडिलांनी देहराडुनच्या कॉलेजमध्ये दाखल केलं. मात्र, त्यांनी शाळा सोडली. त्यांना ऑटोमोबाईल अभियंता व्हायचे होतं. ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी इंग्लंडला धाव घेतली. तिथे रोल्स रॉयल या प्रसिद्ध कंपनीबरोबर त्यांनी तीन वर्षे इंटर्नशिप केली. त्यांना गाड्यांसोबतच विमानांचं प्रचंड आकर्षण होतं. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. त्यांच्याकडे पायलटचा परवानाही होता. १९७४ पर्यंत देशाच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांची उपस्थिती नगण्य होती. त्याकाळात सगळे विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या निषेधार्थ एकत्र उभे ठाकले होते. त्यामुळं इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर केली आणि यचवेळी संजय गांधी भारतीय राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले. देशाला अंतर्गत धोके असल्याचे कारण देत ही आणीबाणी लागू करण्यात आली होती. प्रेसवर सेन्सॉरशिप, जनतेच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आली. अनेक राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली. विरोध करणाऱ्या राजकारणी, विचारवंत, कलाकारांसह हजारो लोकांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं. हा तो काळ होता जेव्हा संजय गांधी त्यांच्या विचित्र निर्णय आणि आदेशांसाठी प्रसिद्ध झाले होते. आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्या सल्लागाराची भूमिका बजावली आणि सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. कुठल्याही मंत्र्याचं-नेत्याचं ते ऐकत नव्हते. ते इंदिरा गांधींचे सल्लागार नक्कीच होते, मात्र, इंदिरा गांधींनाही विश्वासात न घेता अनेक निर्णय स्वत: घेतले. आणीबाणीच्या काळात संजय यांनी हुंडा प्रथा संपुष्टात आणण्याबरोबरच शिक्षण, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, जातिवाद अशा अनेक कठोर कायद्यांची अंमलबजावणी केली. त्यांचा हा कार्यक्रम खरंतर देशहिताचाच होता. मात्र, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमांतर्गत लोकांची जबरदस्तीने नसबंदी करणं, हे केवळ संजय यांनाच नाही तर संपूर्ण काँग्रेसला महागात पडलं. संपूर्ण आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांनी देशावर स्वतःचे निर्णय लादले. या काळात अधिकाऱ्यांना त्यांच्या दबावाखाली काम केले. प्रत्येक खात्यात आणि मंत्रालयात त्यांचा थेट हस्तक्षेप होता. या कारणामुळे इंद्रकुमार गुजराल यांनीही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा राजीनामा दिला होता. याशिवाय प्रशासन आणि पोलिस खात्यातील उच्चपदस्थांनाही संजय यांच्याकडून थेट सूचना मिळत होत्या. आणीबाणीच्या काळात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. आणि त्याची प्रमुख कारणं म्हणजे प्रेसच्या सेन्सॉरशिप, नसबंदीच्या नावाखाली जनतेवर केलेले अत्याचार आणि बंडखोरांना तुरुंगात टाकणं. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संजय गांधींनी पुन्हा काँग्रेसच्या पुनरागमनाची योजना आखली. त्यांच्यामुळेच महागाई हा मुद्दा बनवून काँग्रेस १९८० मध्ये पुन्हा सत्तेत येऊ शकली. त्यावेळी संजय गांधी अमेठीचे खासदार म्हणून निवडून आले होते. कॉंग्रेसचा विजय आणि पुन्हा इंदिराजी पंतप्रधान होण्यात संजय यांचे मोठे योगदान असं म्हटल्या सांगितल्या जातं. संजय गांधींना विमानाचे स्टंट करण्याचा खूप छंद होता आणि हा छंदच त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. २३ जून १९८० रोजी संजय यांनी दिल्लीच्या सफदरगंज विमानतळावरुन उड्डाण केले. मात्र, एअर स्टंट करताना त्यांचे विमान जमिनीवर आदळले. याच विमान अपघातात संजय गांधींनी जगाचा निरोप घेतला.