मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा जोरदार हजेरी लावणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला. आज राज्यात अनेक ठिकाणी पाऊस दडी मारणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं असलं तरी उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/0Sy8D1Ng4j— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2021
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्यापासून पुढचे तीन दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामे करावीत अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मागील काही दिवसांपासून हवामानात काही अंशी बदल झाला असून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्टाचा उत्तर भाग, गुजरात आणि राजस्थान या भागात पाऊस सक्रीय होण्याची चिन्हे असून म्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दरम्यान, १९ सप्टेंबर पासून पुढचे तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.