मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंनी शिवसेनेच्या नव्या चिन्हावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. धनुष्यबाणाने काही उजेड पाडू शकले नाहीत, आता मशालीने काय उजेड पाडणार, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना खरी
मुंबईत पत्रकारांशी बोलताना राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ज्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे ती बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे. ही उद्धवची शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे ४० आमदार आहेत. यांच्याकडे ५-६आहेत. तेही थोड्या दिवसांत जातील असे राणे यावेळी म्हणाले.
आता मशालीने काय क्रांती घडवणार?
मुख्यमंत्री असताना ज्यांनी क्रांती घडवली नाही ते आता मशाली घेऊन काय क्रांती घडवणार? तेव्हा लोकांचे घर उध्वस्त करायला त्यांच्या घराला मशाली लावल्या. आणि एवढा उजेड असताना मशाल कशाला पाहिजे. त्यांना दिसत नाही का. अन्न-धान्य नोकरी हे लोकांचे प्रश्न आहेत. आता धनुष्यबाण काही उजेड पाडू शकला नाही, तर मशालीने काय पडणार असेही राणे यावेळी म्हणाले.