नारायण राणेंवरील टीका भास्कर जाधवांच्या अंगलट येणार?; आता पुण्यातही गुन्हा दाखल, काय म्हटलयं तक्रारीत?
पुणे : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अधिक आक्रमकपणे शिंदे गट आणि भाजपावर टीका करीत आहेत.
भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यातील शाब्दीक युद्ध सुरु झाल्याने वातावरण तापलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे राणे यांचे खासगी स्विय सहायक आहेत. बुधवारी दुपारी ते डेक्कन परिसरातील गुडलक हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक पहात होते.
त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी या मोर्चामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भोषत वक्तव्य केले.
त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या. तसेच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक,भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यास चिथावणी दिली.केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक बदनामी केल्याप्रकरणी शिंगटे यांनी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.
भाजपच्या कार्यकर्त्यांना भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, तक्रारीत म्हटलंय की, ‘कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधात एसीबी कार्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला होता.
मोर्चाच्या वेळी भाजप नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते करणार याची पूर्वकल्पना आल्याने आपणास कालच आम्ही त्यासंबंधी सूचना लेखी तक्रार अर्जाद्वारे दिलेली होती.’