राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या हटके स्टाइल भाषणानं भुरळ पाडणारे अब्दुल सत्तार यांची आता मेळघाटातही हवा झाली. राज्याच्या कृषी मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अब्दुल सत्तार शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात आहेत. त्यांनी बुधवारी केलेल्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं.
महत्वाच्या बाबी
१. कृषी मंत्री अब्दुल सत्तार अमरावतीच्या दौऱ्यावर
२. कृषी मंत्री जाणून घेणार शेतकऱ्यांच्या अडचणी
३. सत्तारांचा शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम, जेवणही घेतलं
४. सत्तारांनी दिले शेतकऱ्यांना २ घरं बांधून देण्याचे आश्वासन
अब्दुल सत्तार सध्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. ते दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागातर्फे ‘एक दिवस माझ्या बळीराजा’साठी हा आगळावेगळा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबवण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ कृषिमंत्री सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथून करण्यात आला. शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या योजनेचा भाग म्हणून सत्तार सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. दरम्यान, सत्तार यांचे बुधवारी रात्री ११ वाजता अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटमधील साद्राबाडी येथे आगमन झालं. साद्राबाडी चे शेतकरी दत्तात्रय चुन्नीलाल पटेल यांच्या निवासस्थानी कृषिमंत्र्यांनी मुक्काम केला. त्यांनी पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद लुटला. सत्तारांच्या या साध्या पाहुणचाराचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. जेवणानंतर शेतकऱ्याशी गप्पा मारल्या. त्यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या. मात्र, मराठवाड्यात राजकीय टोलेबाजी करणाऱ्या या मंत्र्याची त्यांच्या एक कृतीमुळं चांगलीच चर्चा सुरु झाली. त्याचं झालं असं की, सत्तार यांनी बुधवारी रात्री एका शेतकऱ्याच्या घरी अगदी साधेपणाने मुक्काम केला. साद्राबाडी गावातील सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला होता. त्यावेळी सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचं त्यांनी पाहिलं. सत्तारांना शेतकऱ्याची अशी अवस्था पाहावली नाही आणि त्यांनी लागलीच माझ्याकडून या शेतकऱ्यांना दोन चांगली घरं बांधून द्या असे आदेशच सहकाऱ्यांना दिला. बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे गुरुवारी सकाळी लगेच जमिनीचं मोजमाप सुरू झालं. आजचं त्या शेतकऱ्याच्या नव्या घराच्या कामाचं भूमिपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केलं. त्यामुळे मेळघाटात कृषीमंत्र्यांच्या दौऱ्याची सध्या चांगलीच हवा झालीय. शिवाय, त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं. दरम्यान, आज सकाळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतले. आज सायंकाळी ५ वाजता सत्तार हे धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात १० हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.