मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. काल पुण्यात त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुळशी पॅटर्न, हंबीरराव, देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलं असून त्यांच्या जाण्यानं मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठा धक्का बसलाय. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रणीत कुलकर्णी यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली.
हाईलाईट्स
१. प्रणीत कुलकर्णी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
२. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली माहिती
३. ‘आरारारा खतरनाक’ गाण्याचं केलं लेखन
४. कुलकर्णी यांच्या निधनाने सिनेसृष्टीत पोकळी
दोनेक वर्षापू्र्वी येऊन गेलेला मुळशी पॅटर्न हा सिनेमा तुम्ही प्रत्येकानं पाहिला असेल. अनेक कारणांसाठी हा सिनेमा लक्षात राहतो. यात असलेला उत्तम संवाद आणि गाण्यांमुळं या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मात्र, या चित्रपटाचे गीत लेखन करणारे प्रणीत कुलकर्णी याचं निधन झालं. प्रणीत कुलकर्णी यांनी मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गाणं लिहिलं असून या गाण्यानं रसिकांच्या मनावर अक्षरश: भूरळ पाडली. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं. याशिवाय अनेक चित्रपटांसह टीव्हीवर बहुतांश मालिकांसाठीही त्यांनी गाणी लिहिली होती. शिवाय, गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ काम केलं. मात्र, त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू होतो ते फिरोदिया करंडक स्पर्धेपासून. ही स्पर्धा गाजवल्यानंतर त्यांनी मागं वळून पाहीलंच नाही. त्यांनी सुरुवातीला मालिकांसाठी गाणी लिहिली तसंच ‘ऑल द बेस्ट’ या मालिकेचं लेखन आणि दिग्दर्शन केलं. ‘लक्ष्य’ या मालिकेचं लेखनही कुलकर्णी यांचं होतं. शिवबा ते शिवराय या ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक होते. त्याशिवाय ‘जीवन यांना कळले हो’ या स्टेज रियालिटी शोचे लेखन, दिग्दर्शनही त्यांनी केलं. अशा अष्टपैलू कलावंताच्या अचानक जाण्यानं मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली.