देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सीबीएसई बोर्डानं दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर राज्य सरकारवर बोर्डाच्या परिक्षेसंदर्भात काय निर्णय घेणार? दहावी-बारावी परीक्षांचं काय होणार? केंद्रीय बोर्डाचा हाच निर्णय एसएससी बोर्डालाही घेता येणं शक्य आहे का? परिक्षा रद्द केल्या तर गुण कसे मिळतील, गुण देण्याचे नेमके काय निकष असतील…. या सगळ्याचा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर काय परिणाम होईल? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यासह पालकांच्या मनात आहेत. आणि याच विषयी आपण जाणून घेणार आहोत.
सीबीएसई बोर्डानं दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत काही दिवसांपूर्वीच दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं. मात्र सीबीएसई बोर्डानं दहावीची परीक्षा रद्द केल्यानं तसाच निर्णय राज्य सरकार घेणार का, याकडं सगळ्याचं लक्ष लागलं. कारण कोरोना रूग्णांच प्रमाण वाढत असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणं, बोर्डाला परीक्षा आयोजित करणं, उत्तरपत्रिका परीक्षकांकडं पोहोचवणं, आणि निकाल तयार करणं ही सर्व प्रक्रीया करणं कोरोनाच्या काळात कठीण दिसतं. त्यामुळे राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय.
केंद्रीय बोर्डाचा निर्णय
सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करतांना विद्यार्थ्यांचा निकाल ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिआच्या आधारावर म्हणजेच वस्तुनिष्ठ निकष पद्धतीच्या आधारे जाहीर करण्यात येईल असं केंद्रीय बोर्डानं सांगिलतलं.
दहावीचे जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील त्यांना योग्य परिस्थिती असेल तेव्हा पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येईल असंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं. तर बारावीची परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. ही परिक्षा ४ मे ते १४ जून या कालावधीत होणार होती. मात्र आता सीबीएसई बोर्ड या परिक्षेसंदर्भात १ जून २०२१ ला निर्णय घेणार आहे.
परीक्षा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी कल्पना देण्यात येईल असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
सीबीएसई बोर्ड दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे देणार?
दरवर्षीप्रमाणे सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा लेखी स्वरुपात होत असतेय. मात्र, यंदा कोरोनामुळे सीबीएसईची बोर्डाची लेखी परिक्षा घेणं शक्य नाही. लेखी परिक्षेऐवजी सीबीएसई बोर्ड वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार आहे. वस्तुनिष्ठ निकषांच्या विषयी अद्याप स्पष्टता नाहीय. मात्र, वस्तूनिष्ठ निकष म्हणजे केंद्रीय बोर्ड काही वेगळ्या पर्यायांचा विचार करत असल्याचं दिसतंय. यामध्ये इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच एमसीक्यू असे पर्याय असू शकतात. वर्षभरात शालेय स्तरावर घेतलेल्या अशाच परीक्षांच्या गुणांवरही केंद्रीय बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करू शकतं. आणि याच गुणांच्या आधारे अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
राज्य सरकारनं परिक्षा रद्द केल्या तर....
सीबीएसईच्या धर्तीवर राज्य सरकार परिक्षा रद्द करणार का? याकडं विद्यार्थ्यांच लक्ष लागलं. राज्य सरकारनं बोर्डाची परिक्षा रद्द केली तर विद्यार्थ्यांना गुण कशाच्या आधारावर देणार? आणि पुढं अकरावीचे प्रवेशही कशाच्या आधारावर होणार? हे देखील सरकारणं स्पष्ट गरजेचं आहे. कारण सीबीएसईनं वस्तूनिष्ट निकषांच्या आधारावर गुण देण्याला प्राधान्य दिलं. तर राज्य सरकारला वस्तूनिष्ट निकष वापरणं शक्य नसल्याचं सांगण्यात येतं. कारणं वर्षभर शाळेत विद्यार्थ्याकडून इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स करून घेतल्यात का, अशी शंकाही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांनी व्यक्त केली.
राज्य बोर्डापुढच्या अडचणी?
सीबीएसईप्रमाणेच एसएससी बोर्डाला दहावीची परीक्षा रद्द करायची असल्यास अकरावीचे प्रवेश कशाच्या आधारावर होणार? हे आधी ठरवावे लागेल असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात. परीक्षा न घेणं हा पर्याय अडचणीचा ठरू शकतो. कारण परीक्षा न घेता निकाल कशाच्या आधारावर जाहीर करणार? आणि प्रवेश कसे देणार? एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा हा लेखी स्वरुपात असतो. शिवाय, अकरावीत प्रवेशासाठी निकाल आवश्यक आहे. तेव्हा बोर्डाला परीक्षा रद्द करण्यापूर्वी ठोस पर्याय शोधावा लागेल. कारण सीबीएसई बोर्डाने ज्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे निकाल जाहीर करू असं म्हटलंय, एसएससी बोर्डासाठी हा पर्याय मात्र आव्हानात्मक आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कारण, ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आणि संगणकची सुविधा असणं गरजेचं आहेय. आणि ही यंत्रणा तातडीने उभी राहू शकत नाही असं स्वत: शिक्षण विभागाने स्पष्ट केल. तसंच आपल्याकडे केवळ २० गुणांची इंटरनल परीक्षा झालीय. त्यामुळे केवळ त्या आधारावर पूर्ण निकाल जाहीर कसा जाहीर करणार? हा प्रश्न उभा राहतो.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
सीबीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने एसएससी बोर्ड परीक्षा रद्द करणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यासह पालकांच्या मनात आहेत. याविषयी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलतांना म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारसाठीही विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सीबीएसईप्रमाणेच परीक्षा रद्द करून ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरनल असेसमेंट घेण्याबाबत आम्ही अभ्यास करू आणि तज्ज्ञांशी बोलू. असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळं सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य सरकार निर्णय घेणार का? आणि घेतलाच तर विद्यार्थ्याचं शालेय वर्ष फुकट तर जाणार नाही ना अशी भीतीही पालकांच्या मनात आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अनेक शक्यतांचा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचं वास्तव डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घ्यावा, असा पालकांसह विद्यार्थ्यांच्या चर्चेचा सूर आहे. तर राज्य सरकारनं परिक्षेसंदर्भात स्पष्टता करणं गरजेचं आहे.