शिर्डी : मला आता वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली, तर विधानसभा (Vidhansabha Election) लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारीबाबत समन्वय होणार नसेल, अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर (Sangamner) आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सुचक वक्तव्य माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केले.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या दौऱ्याबाबत त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मतदारसंघातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार आहेत. आमच्या कुटूंबाच्या दृष्टीनेसुद्धा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डीमधून निवडणूक लढवेल, ही चर्चा निष्फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आमदार राम शिंदे यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. त्याच पद्धतीने विधानसभेला कोणी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली असेल तर, यात गैर काही नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदारसंघ राखीव आहे. कोपरगावचे राजकारण क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल, तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सूचक वक्तव्य यांनी केले.