दिल्ली : देशात सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधीच महागाईचे चटके बसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक झळ बसणार आहे. आता गर्लफ्रेंडशी बोलणं महाग होणार आहे. तुमचं कॉलिंगच नाही तर आता इंटरनेटचा रिचार्जही महागण्याची शक्यता आहे. मोबाइल वापरणाऱ्या लाखो युजर्सना धक्का बसू शकतो. दूरसंचार कंपन्या ५ जी सेवांमुळे रिचार्ज वाढवण्याची शक्यता आहे. CNBCने दिलेल्या वृत्तानुसार मोबाईलचे दर १५ ते२० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याचं म्हटलं आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये मोबाईलचे रिचार्ज वाढवण्यात आले होते. या अहवालानुसार दूरसंचार कंपन्यांना ५ जी सेवा चालवण्यासाठी दीड ते दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी कंपन्या सध्याच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करू शकतात.
फिच रेटिंग्ज आणि जेएम फायनान्स यांनीही मोबाइल प्लॅनच्या टेरिफची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत झालेली वाढ ही केवळ प्री-पेड पुरतीच मर्यादित राहणार नाही, तर पोस्ट पेड प्लॅनच्या किमतीही वाढ होऊ शकते.
जेएम फायनान्सने दिलेल्या अहवालानुसार रोल आउट फंडशी जोडलेल्या टेलीकॉम कंपन्यांचे टेरिफ प्लान हे दोन ते तीन टप्प्यात वाढण्याची शक्यता आहे. तर फिंचने सादर केलेल्या अहवालानुसार १५ ते २० टक्क्यांनी रिचार्जचे दर वाढण्याची शक्यता आहे.
मोबाईल रिचार्जचे प्लॅन वाढणार असल्याचे संकेत
वोडाफोन-आयडियाच्या CEO यांनी दिले होते. या पूर्वी २०२१ मध्ये रिचार्जचे दर वाढवण्यात आले होते. 5G मुळे रिचार्जचे प्रीपेड आणि पोस्ट पेडचे दर वाढल्यामुळे खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.