दररोज अनेक प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. सणासुदीच्या काळातही काही लोक एकटे तर काही कुटुंबासह घरी जातात. अशा स्थितीत कधी कधी घाईगडबडीत काहीतरी विसरायला होतं. त्यामुळं चिंता करावी लागते. पण समजा तुमचं रेल्वेचं तिकीट हरवलं किंवा घरी विसरलं तर चांगलीच पंचाईत होते. अशावेळी विनातिकीट प्रवास करणं हा काही त्यावरचा पर्याय नाही. कधी कधी विनातिकीट प्रवास केल्यास भारी दंडही आकारला जातो. त्यामुळं ट्रेनचं तिकीट हरवल्यानंतर प्रवास करण्यासाठी काय पर्याय आहेत? याच विषयी जाणून घेऊ.
अनेकवेळा असं दिसून येतं की प्रवासादरम्यान अनेक लोकांचे रेल्वेचं तिकीट हरवतं किंवा फाटतं, त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. तिकीट हरवलं म्हणजे आता ट्रेनमध्ये प्रवास करता येणार नाही, असं खूप जणांना वाटतं. कारण विना तिकीट प्रवास केल्यास टीटीई पकडेल आणि फाइन घेईल अशी भीती लोकांना असते. मात्र आता तिकीट हरवलं तरीही टेंशन घेण्याची गरज नाही. कारण, तुमचं ट्रेन तिकीट हरवलं असेल, तरीही तुम्हाला प्रवास करता येतो.
आजच्या काळात रेल्वेचं रिझर्व्हेशन करतांना तुमच्या मोबाईल किंवा मेलवर तुम्हाला कन्फर्म तिकीटाचा मेसेज येतो. त्यामुळे तुमचं तिकीट हरवलं असेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये कन्फर्म तिकिटाशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर तुम्ही ती TTE ला दाखवू शकता. आणि प्रवास करू शकता. पण जर तुमच्या फोनमध्ये तिकीट दाखवण्याची सुविधा नसेल, तर त्यासाठी भारतीय रेल्वेने तुम्हाला डुप्लिकेट तिकीट घेण्याचा पर्याय ठेवलाय. कारण ही परिस्थिती कुणासोबतही उद्भवू शकते, हे भारतीय रेल्वेलाही समजते. ही एक सामान्य बाब आहे. अशा परिस्थितीत तुमचं तिकीट हरवल्यास तुम्ही रेल्वे काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता; मात्र त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील.
भारतीय रेल्वेच्या indianrail.gov.in या वेबसाइवर दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्हेशन चार्ट तयार होण्यापूर्वी कन्फर्म तिकीट हरवल्याचं तुम्ही रेल्वेला कळवलं, तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट देण्यात येतं. सेकंड क्लास आणि स्लीपर क्लासचं तिकीट हरवल्यास तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील. आणि अन्य क्लासचं तिकीट हरवल्यास १०० रुपये मोजावे लागतील. रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट हरवलं तर एकूण तिकीटच्या ५० टक्के पैसे घेऊन डुप्लिकेट तिकीट देण्यात येतं.
भारतीय रेल्वेची डुप्लिकेट तिकीट सुविधा केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांसाठीच आहे. वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांना किंवा RAC तिकीट असलेल्यांना डुप्लीकेट तिकीट दिलं जात नाही. कारण वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशांचं नाव रिझर्व्हेशन चार्टमध्ये देण्यात येत नाही.
दुसरं असं की, तिकीट हरवल्यामुळे तुम्ही डुप्लिकेट तिकिटासाठी अर्ज केला. मात्र, त्यानंतर तुमचं तिकीट सापडलं आणि ते दोन्ही तिकीट्स ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांना दाखवली, तर त्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट तिकिटासाठी भरलेली रक्कम ५ टक्के कपात करून परत दिली जाते.
दरम्यान, तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमचं तिकीट जपून ठेवा. कारण तिकीट हरवल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळेल; मात्र, त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. त्यामुळं आपलं ओरिजिनल तिकीट सांभाळून ठेवलेलं कधीही चांगलं.