Khan Sir : बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या रेल्वे आंदोलनातून चर्चेत आलेले खान सर आहेत तरी कोण? नेमकं प्रकरण तरी काय?
बिहारमधील रेल्वे परीक्षांच्या मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं असून आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. रेल्वे परीक्षांच्या निकालांवर आक्षेप घेणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरात चक्क एक रिकामी रेल्वेच पेटवून दिल्याचा प्रकार आज समोर आला.. त्यामुळे देशभर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून त्याहून जास्त चर्चा या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ‘खान सरां’ची आहे. दरम्यान, देशभरात चर्चेत आलेले आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले खान सर आहेत तरी कोण? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
हायलाईट्स
१. बिहार रेल्वे भरती हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल
२. कोचिंग क्लासेससह तब्बल ४०० जणांवर कारवाई
३. पाटण्यातील खान सर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
४. परीक्षार्थींना आंदोलनासाठी भडकल्याचा खान सरांवर आरोप
रेल्वे भरती बोर्डाने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अर्थात एनटीपीसी नोकरभरतीसाठी घेतलेल्या सीबीटी २ परीक्षांचे निकाल १४ आणि १५ जानेवारी रोजी जाहीर केले. त्याच आधारावर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांसाठी उमेदवारांची यादी तयार केली जाणार होती. मात्र, या निकाल प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी आंदोलनाला सुरुवात केली. २४, २५ आणि २६ जानेवारी असे सलग तीन दिवस या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतलं असून, आज सकाळी आक्रमक आंदोलकांनी गया जिल्ह्यात ट्रेन पेटवून दिल्याची देखील घटना समोर आली. याप्रकरणी आता एकूण ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण आक्रमक आंदोलन आणि जाळपोळ केल्याची कबुली काही आंदोलकांनी दिल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, याप्रकरणी ‘खान सरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर एफआयआर नोंदवल्यानंतर सोशल मीडियापासून गुगल सर्च इंजिनपर्यंत खान सरांचंच नाव ट्रेंड होतंय. स्पर्धा परीक्षा तसेच रेल्वेसह इतर भरती परीक्षांबाबत खान सर हे क्लासेस घेतात. त्यांचं पुर्ण फैजल खान असल्याचं सांगितल्या जातं. ते मूळ देवरिया, उत्तर प्रदेशचे असून, ते पाटना येथे जीएस कोचिंग सेंटर चालवतात. खान सरांची लहानपणापासूनच अभ्यासामध्ये चांगली प्रगती होती. त्यामुळे ते आताही चांगल्या प्रकारे मुलानांही शिकवतात. कोचिंग सेंटर चालवण्यासोबतच ते प्रसिद्ध यूट्यूबर असून ते मोफत क्लासेस ही घेतात. ग्रामीण लहेजा असणाऱ्या भाषेत अत्यंत मनोरंजक पद्धतीनं ते शिकवत असल्यानं खान सरांचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. शिकवण्याच्या त्यांच्या खास शैलीमुळे फार कमी काळात ते प्रसिद्ध झाले. खान सरांनी सामान्य ज्ञान आणि विज्ञान विषयांवर काही पुस्तकंही लिहिली आहेत. याशिवाय, त्यांनी उर्दू भाषेतही एक पुस्तकही लिहिलंय. खान सरांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी आहेत. तर आई गृहिणी असून, खान सरांचा मोठा भाऊ सुद्धा लष्करात कमांडो म्हणून तैनात आहे. कुटुंबातील लष्कराच्या वातावरणामुळे खान सरांनी बारावीचं शिक्षण पूर्ण करून लष्करात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेण्याची तयारीही केली होती. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखती दरम्यान त्यांची निवड झाली नव्हती… यानंतर खान सरांनी स्वत: कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. पुढं, जेव्हा त्यांनी यूट्यूबवरती क्लास घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून ते उत्तर प्रदेश आणि बिहारसह संपुर्ण विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. त्यांचे छोटे छोटे व्हिडीओ देखील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात स्टेटसला स्टोरीला टाकत असतो. खान सरांचा राजकारणाशीही संबंध असल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, या प्रकरणात खान सर यांच्यासोबत इतर पाच शिक्षकांविरोधात विद्यार्थ्यांना भडकवल्याच्या गुन्हा दाखल केला. मात्र, यानंतर देखील खान सर यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थींनी पुढाकार घेतला. एकीकडे खान सर आणि इतर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झालेला असताना दुसरीकडे हे आंदोलन आता बिहारमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकू लागलं. या आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचं पाहून सरकारने तातडीने पावलं उचलली असून ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.