गुड न्यूज! रेल्वे प्रवासादरम्यान घेता येणार २ दिवसाचा ब्रेक, त्याच तिकीटावर करता येणार पुन्हा प्रवास, पण कसं?
देशातील कोट्यावधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुम्ही देखील ट्रेननं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही एखाद्या दूरवरच्या प्रवासाला निघालात आणि रेल्वेतून अचानक उतरत असाल तर, पुन्हा प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं. यामुळं प्रवाशांना अनेकदा अडचणींना सामोरे जावं लागतं. मात्र, प्रवाशांची ही अडचण आता दूर होणार आहे, कारण रेल्वे आताब्रेक जर्नी रुल घेऊन आलीये. दरम्यान, ब्रेक जर्नी रुल आहे तरी काय? याचा प्रवाशांना काय फायदा होणार? याच विषयी जाणून घेऊ.
प्रवासाचं स्वस्त आणि वेगवान साधन म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पाटण्याहून दिल्लीला रेल्वेने जाताना तुम्हाला दोन दिवस लखनऊ किंवा कानपूरमध्ये घालवता येतील आणि नंतर त्याच तिकीटावर दिल्लीला जाता येईल… हो, आता हे शक्य आहे. खरंतर रेल्वेच्या या विशेष सुविधेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कारण, लोकांना एवढचं ठाऊक असतं की, ज्या स्टेशनवर तुम्ही उतरलात तिथून पुढं प्रवास सुरू करण्यासाठी तुम्हाला परत तिकीट काढावं लागतं. मात्र, ब्रेक जर्नी रुलमुळं प्रवास अधिक सोईचा होणार आहे. रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जर एखाद्या प्रवाशानं लांबच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षित केलं असेल, तर त्याला आता मध्येच एखाद्या रेल्वेस्टेशनवर उतरण्यास आणि दोन दिवसांच्या आतमध्ये पुन्हा रेल्वेने पुढील प्रवासाला सुरुवात करण्याची सुविधा मिळते. मात्र यासाठी काही ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत संबंधित प्रवाशाला फार त्रास होत नाही.
ब्रेक जर्नी रुल नेमका काय आहे?
भारतीय रेल्वेने प्रवाशांना अनेक अप्रतिम सुविधा दिल्यात. त्यापैकीच एक म्हणजे जर्नी ब्रेक सुविधा. जर एखाद्या प्रवाशाच्या तिकीटाचं आरक्षण हे ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी असेल, तर तो प्रवासी प्रवासादरम्यान मार्गातील कोणत्याही एका स्टेशनवर उतरून दोन दिवसांसाठी आपला जर्नी ब्रेक करू शकतो. आणि नंतर पुन्हा त्याच तिकीटीवर आपला पुढचा प्रवासही करु शकतो. मात्र, प्रवास सुरू झाल्यापासून ५०० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यावरच या सुविधेचा प्रवाशांना लाभ घेता येईल. याशिवाय, जर तुमचं तिकीट हे एक हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरासाठीचं असेल, तर रेल्वे तुम्हाला संपूर्ण प्रवासात दोनदा आपली जर्नी ब्रेक करण्याची सुविधा देते. मात्र, तुमच्या शेवटच्या स्टेशनच्या आधीच्या स्टेशनवर तुम्हाला जर्नी ब्रेक सुविधा दिली जात नाही.
लाभ कसा घ्यायचा?
रेल्वेची ही सुविधा अतिशय चांगली आहे, मात्र या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहं. जर एखाद्या प्रवाशाला आपला प्रवास मध्येच एखाद्या स्टेशनवर थांबवायचा असेल आणि नंतर पुढील प्रवास त्याच तिकीटावर करायचा असेल, तर त्याला ही माहिती स्टेशन व्यवस्थापक किंवा तिकीट कलेक्टरला द्यावी लागेल. आणि त्यांच्या परवानगीनंतरच प्रवाशाला आपला प्रवास थांबवता येईल. खरंतर, रेल्वे नियमानुसार प्रवाशांना आपला प्रवास थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, ही माहिती स्टेशन व्यवस्थापक आणि टीटीईला देणं गरजेचं असतं. असं केल्यामुळं तुम्हाला पुन्हा तुमचा प्रवास सुरू करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. महत्वाचं म्हणजे, काउंटरवरही तिकीट बुक करताना तुम्हाला जर्नी ब्रेक करण्याची माहिती द्यावी लागेल. अन्यथा तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला जर्नी ब्रेक करायची असेल तर जर्नी ब्रेक करता येणार नाही. दुसरं म्हणजे, राजधानी, शताब्दी आणि जनशताब्दी गाड्यांमध्ये प्रवास करताना प्रवाशांना जर्नी ब्रेकची सुविधा दिली जाणार नाही.