तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्ते परतले. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते भारतात आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे चित्ते आणले असून ते मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात सोडण्यात आले. या आठ परदेशी चित्त्यांत पाच मादी आणि तीन नर आहेत. दरम्यान, सिंह, चित्ता, वाघ आणि बिबट्या यांच्यात अधिक शक्तिशाली कोण? याच विषयी जाणून घेऊ.
महत्वाच्या बाबी
१. तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्ते परतले
२. चित्ता हा ११२ किमी प्रतितास वेगाने धावतो
३. वाघाचा धावण्याचा वेग ताशी ६४ किलोमीटर
४. चित्ता हा सिंहासारखी गर्जना करू शकत नाही
चित्ता
चित्ता आणि बिबट्या दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. चित्ता थोडा लहान असतो. चित्त्याचे डोळे खोलवट आणि काळे असतात. त्याचा चेहरा बिबट्यापेक्षा लहान असतो. चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने धावणारा जमिनीवरील प्राणी आहे. चित्ता साधारणपणे ११२ किमी प्रतितास वेगाने धावतो. मात्र, चित्ता धावत लांब पल्ला गाठू शकत नाही. तो फक्त एका मिनिटासाठी जास्तीत जास्त वेगाने धावू शकतो. चित्ता तीन सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो. मोठ्या मांजरीच्या कुटुंबातील चित्ता हा एकमेव सदस्य आहे जो गर्जना करू शकत नाही.
सिंह
सिंह हा वाघ, चित्ता आणि बिबट्या या तिघांपेक्षा वेगळा असतो. सिंहाच्या तोंडावर खूप सारे केस असतात. मोठ्या मांजरीच्या कुटुंबातील सिंह हे एकमेव प्राणी आहेत जे एकत्र शिकार करतात आणि एकत्र अन्न शोधतात. जंगलाचा राजा असलेला सिंह ताशी ८० किलोमीटर वेगाने धावू शकतो. सिंहाचे शरीर मोठे आणि वजनदार असते. सिंह १० फूट लांबीपर्यंत वाढू शकतात आणि २५० किलोग्रॅमपर्यंत त्यांचे वजन असू शकते. आफ्रिका आणि भारतात सिंह आढळतात. सिंहामध्ये इतकी ताकद असते की तो कोणत्याही मोठ्या प्राण्याची शिकार करू शकतो. तो म्हशीलाही सहज मारू शकतो.
वाघ
मांजरीच्या कुटुंबात वाघ हा आकाराने सर्वात मोठा आहे. वाघाच्या शरीरावर दिसणार्या पट्ट्यांमुळे त्याला ओळखणे अगदी सोपे आहे. वाघ हे सिंहापेक्षा उंच, अधिक स्नायुयुक्त आणि वजनाने सामान्यतः जड असतात. वाघाची लांबी १० फूट असून असते. वाघाचे वजन सिंहापेक्षा जास्त असते. ३०० किलोपर्यंत वाघाचे वजन असू शकते. वाघाचा धावण्याचा वेग ताशी ६४ किलोमीटर आहे. वाघांचे पाय मजबूत असतात आणि ते सिंहापेक्षा जास्त सक्रिय आणि चपळ असतात. वाघ भारत, इंडोनेशिया, रशिया आणि भूतानच्या पर्वतांमध्ये आढळतात. वाघाने आपला पंजा भक्ष्याभोवती आवळला की, त्याची सुटका होणे कठीण असल्याचे सांगितले जाते.