नवीदिल्ली : जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. केंद्र सरकारने बुधवारी गरीबांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी तीन महिन्यांनी म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवला. त्यासाठी ४४,७०० कोटी रुपये खर्च येणार आहे. गरिबांना महागाईपासून काहीसा दिलासा देण्याबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की ही योजना शुक्रवारी संपत आहे. तीची मुदत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत ८० कोटी गरिबांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दिला जातो.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे फायदे
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील गरीब जनतेला मोफत रेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सातव्या टप्प्यांतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जात आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोफत रेशन वाटपाचा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी, सरकार अंदाजानुसार ४४,७६२ कोटी रुपये अनुदान देईल. या योजनेंतर्गत अंदाजे १२२ लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित केले जाईल.