भारत-पाकिस्तान संबंध किती पातळी गाठू शकतात, याचा नवीन शोध जवळपास रोज लागतो. आंतरराष्ट्रीय बैठकीत, आपसांतील संपर्कात आणि इतर राष्ट्रांशी संबंधांत भारत-पाकिस्तान यांच्यात नेहमी शाब्दीक चकमकी होतात. जम्मू आणि काश्मीर येथील ताबा रेषेवर तर युद्धसदृष्य स्थिती आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाल्यास किती जीवितहानी होऊ शकते, याची धक्कादायक माहिती समोर आली.
सध्या रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. तर चीन आणि तैवानमध्ये संघर्ष भडकण्याची चिन्हे आहेत, अशा परिस्थितीत अणुयुद्ध झाल्यास काही मिनिटांमध्ये कोट्यवधी लोकांचा मृत्यू होईल. एका अभ्यासानुसार जर संपूर्ण जगामध्ये अणुयुद्ध भडकल्यास काही मिनिटांमध्येच कोट्यवधी लोक मारले जातील. तर त्यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हा अणुयुद्धानंतर पडणाऱ्या दुष्काळामुळे होईल. या संशोधनानुसार, अणुयुद्धोत्तर जगात सुमारे ५०० कोटी लोक हे अन्नपाण्यावाचून मृत्युमुखी पडतील. अणुयुद्धानंतर शेतातील धान्य, झाडे, वृक्ष, वेली सारे काही नष्ट होईल. पिण्याच्या पाण्याचे स्रोत रेडिएशनमुळे दूषित होईल. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी असलेले देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही देश अण्वस्रसज्ज असल्याने दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला गेल्यास अणुयुद्धाचा धोका संभवतो. जर भारत आणि पाकिस्तान या न्युक्लिअर पॉवर असलेल्या या दोन देशात अणुयुध्द झालं तर त्याचे परिणाम भयंकर गंभीर असतील, असा हा अहवाल सांगतो. हे युध्द केवळ दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाही. ज्या देशात अणुयुद्ध पोहोचणार नाही, अशा देशांनाही भयावह परिणामांचा सामना करावा लागेल. भारत आणि पाकिस्तानकडे अमेरिका आणि रशियाप्रमाणे प्रचंड अण्वस्रे नाहीत. मात्र शास्त्रज्ञांच्या मते दोन्ही देशांत अणुयुद्ध सुरू झाल्यास दोन्ही देश किमान १०० अण्वस्रांचा वापर करतील. त्यातील प्रत्येक अण्वस्रातून सरासरी १५ किलोटन उर्जा उत्सर्जित होईल. भारत आणि पाकिस्तानमध्ये भडकणाऱ्या संभाव्य अणुयुद्धातून उत्सर्जित होणाऱ्या उर्जेमुळे तत्काळ सुमारे पावणे तीन कोटी लोकांचा मृत्यू होईल. तसेच या अणुयुद्धामुळे सुमारे ५ मेगाटन राख निर्माण होईल. त्याबरोबरच पुढील दोन वर्षांमध्ये अन्नधान्याच्या टंचाईमुळे २५.५ कोटी लोकांचा मृत्यू होईल. हा अहवाल रटगर्स विद्यापीठाचे प्राध्यापक एलन रोबोक यांनी केला. त्यांनी या अहवालात सांगितलं की, अणुयुद्धानंतर संपूर्ण जगामध्ये आण्विक थंडी पसरेल. हा काळ सुमारे ४० वर्षांचा असेल. कारण अणुबॉम्बच्या स्फोटांमुळे निर्माण होणारी राख काही आठवड्यांमध्येच जगभर पसरेल आणि सूर्याची किरणे शोषून घेईल. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरांमधील तापमान आणि पृथ्वीवरच्या धुराचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढेल. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये २० ते ३५ टक्के इतकी घट होईल. वातावरणांमधील या बदलांमुळे जागतिक स्तरावर हरितक्षेत्रही १५ ते ३० टक्क्यांनी कमी होणार असून महासागरांची उत्पादकताही ५ ते १५ टक्क्यांनी घटणार आहे, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे खरंच जर युद्ध झालं तर ते दोन्ही देशांसाठीच नव्हेतर जगासाठीही किती गंभीर असेल हेच या अहवालावरुन स्पष्ट होतंय