राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार कोसळणार; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत
अहमदनगर : महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा ते कधी पडणार याच्या तारखा वारंवार भाजपकडून दिल्या जात होत्या. महाविकास आघाडीने तरीही अडीच वर्षे पूर्ण केली. त्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलं. शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थिर आहे का? असा सवाल वारंवार केला जातोय. त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जाताहेत. विरोधकांकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याचा दावाही केला जातोय. मात्र, हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. मात्र, शिर्डीतील अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं जयंत पाटील यांनी केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत मंथन शिबीर आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाला आजपासून सुरूवात होतेय. या शिबीराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिर्डीत आले होते. काल त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलंय. शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीतलं शिबीर झाल्यावर शिंदे-फडणवीस सरकार पडेल असा दावा जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, खासदार सुजय विखे पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं होतं. त्या टीकेलाही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी हा राज्यातला सर्वात खंबीर पक्ष आहे. हा पक्ष फुटणार नसल्याचं त्यांनी सांगिलतं.