Ramdas Kadam: पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली; शिवसेना कोसळतांना पाहावत नाही; रामदास कदम ढसाढसा रडले
एकीकडे शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसागणिस वाढतेय. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख यांच्या पाठोपाठ आता पदाधिकारी देखील पक्षाला जय महाराष्ट्र करताहेत. असं असतानाच आता शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम हे शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याची माहिती होती. अखेर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, या राजीनाम्यानंतर त्यांनी आज एका वृत्त वाहिनीली दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बाबी
१. शिवसेना कोसळताना पाहावत नाही – कदम
२. ‘शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली’
३. रामदास कदम यांना मुलाखतीत अश्रू अनावर
४. ५२ वर्ष शिवसेनेसाठी लढलो – रामदास कदम
रामदास कदम यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक अशीच होती. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांना शिवसेने नेतेपद दिले होते. मात्र, शिवसेनेची सत्ता असताना देखील ते पक्षापासून दुरावलेले होते. शिवाय अनिल परब आणि त्यांच्यातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले होते. असं असताना आपण शिवसेना पक्ष सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी मध्यंतरी घेतली होती. मात्र, काल त्यांनी आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. गेली ५२ वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आलीये, हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे. गेल्या महिनाभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर भविष्यातही एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी कायम प्रयत्न राहणार असल्याचेही ते म्हणाले. रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित केले. पुढं बोलतांनी त्यांनी सांगितलं की, मी ५२ वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केलं. राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र, आज माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालीय. आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून आमचं भविष्य अशाप्रकारे अंध:कारमय होईल, असं वाटलं नव्हते. शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन आनंदी नाही, खुश नाही, समाधानी नाही. बाळासाहेब ठाकरे आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहेत, मला प्रचंड वाईट वाटतंय. मात्र, ही वेळ आमच्यावर का आली, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे, असे म्हणत असतांनाच कदम यांचे डोळे पाणावले होते. जे घडलंय ते शरद पवारांनी घडवून आणलंय. त्यांच्यामुळे पक्ष फुटलाय. त्यांच्यामुळे आमदार-खासदारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचंही कदम बोलले. दरम्यान, मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता. तुम्ही इकडे या, आपण बसून, बोलूया, असे उद्धव ठाकरे बोलतील, ही माझी अपेक्षा होती. मात्र, मी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली. आम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरे यांनी विसरु नये, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. दरम्यान, आता रामदास कदम शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार का? त्यांची पुढची रणनीती काय असेल हेच पाहणं महत्वाचं आहे.