वर्धा : जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीच्या मदतीचा जीआर आज काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात होईल, असंही सत्तार यांनी सांगितलं होतं. मात्र, शासनाकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान मिळालं नाही.
यंदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला होता. अशातच ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलचं झोडपून काढलं. याचा पिकांना चांगलाच फटका बसला. अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यानं पिकं पाण्यात गेली. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी झाली. खरीप पिकांचे चांगलेच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. दरम्यान, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं, त्याच्या भरपाई देण्याची घोषना राज्य सरकारने केली होती. मात्र, घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या पदरात निराशच पडल्याचं चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी आली. वर्ध्यात तीनदा अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशातच आता पुढील पाच दिवसांमध्ये राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. वर्ध्यात अजूनही पाऊस सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकं आणि शेतं पाण्यात गेल्यानं शेतकरी हवादिल झाले. तर अनेक भागात कपासीचे पीक नदीच्या पुराने वाहून गेल्याचं चित्र आहे. मात्र या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळं कृषी आणि महसूल खात्याच्या कारभाराबद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या वेदना कधी कळतील, असा संतप्त सवाल बळीराजा करतोय. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होते.