किसानपुत्राचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र : ‘मुख्यमंत्री साहेब, अनुदानाचे पैसे द्या, दिवाळीला पुरणपोळी खायला या’
हिंगोली : राज्यभरात अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, अशातच हिंगोलीतील एका चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलंय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी यामुलानं हे पत्र लिहिले आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र प्रचंड व्हायरल सुद्धा होतंय.
“मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सणाला पुरणपोळ्या मिळाल्या नाहीत. बाबा मला पाणीपुरी खायला दहा रूपये देखील देत नाहीत. आई म्हणतेय शेती नुकसानीचे अनुदान आलं की तुला पैसे देईन. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या”. अशी भावनिक साद हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावच्या एका चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून घातली आहे.
‘एवढंच नव्हे तर दिवाळीला आईने केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी या, असे निमंत्रण देखील शेतकऱ्याच्या या मुलानं मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.
शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र
“मुख्यमंत्री साहेब, माझे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी आहे असे बाबा म्हणतात. बाबा मला पाणीपुरी खायला दहा रूपये देखील देत नाहीत. यावर्षी सोयाबीनचं नुकसान झालं असं बाबा म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत. सणाला पोळ्या तर सोडा साधे गुपचूपसाठी पण पैसे सध्या नाहीत.
काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या. आई म्हणतेय शेती नुकसानीचं अनुदान आलं की तुला पैसे देईन. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या. दिवाळीला आईने केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी या’