मुंबई : मुंबईतल्या धीरूभाई अंबानी शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधी शाळेने बीकेसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे. शाळेमध्ये फोन करून ही धमकी दिल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉल करणाऱ्याने विक्रम सिंह अशी स्वत:ची ओळख सांगितली. इतकंच नाहीतर आरोपीने गुजरातहून शोळेच्या लँडलाईनवर फोन करून शाळेत टाईम बॉम्ब ठेवला आहे, असं सांगत फोन ठेवून दिला. यामुळे संपूर्ण शाळेत भीतीचं वातावरण असून आता पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास शाळेच्या लँडलाईनवर एक फोन आला. यावेळी आरोपीने बॉम्ब ठेवल्याचं सांगत फोन कट केला. यानंतर लगेच शाळेने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने बॉम्ब शोध व निकामी पथक शाळेत पाठवून तपास सुरू केला. पण कुठेही बॉम्ब सापडला नसून शाळेचा परिसर सुरक्षित असल्याची माहिती दिली.
शाळेकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात कलम ५०५ (१)(बी)आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीचा शोध घेत त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.