मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळालेल्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) त्यांचे मनोबल वाढले आहे. लोकसभा निवडणुकी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) तब्बल १४०० हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. यात मराठवाडा आणि विदर्भातील सर्वाधिक अर्ज आहे. एकंदरित राज्यात काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा लढवित १३ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेतही पक्षाला विधानसभेत ८० ते ८५ जागा मिळतील आणि काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे काँग्रेसने सर्व जागांवरील इच्छुकांचे अर्ज मागितले होते. त्यासाठी आता १४०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही काळापासून भाजपची मजबूत पकड होती. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने या भागात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले.
मोदी सरकारने १० वर्षांत जनतेचे ३५ लाख कोटी लुटले; मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप
२०१४ नंतर भाजप महाराष्ट्र विधानसभेत हळूहळू मजबूत पक्ष बनला. तर त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा कमी होत गेल्या. २०१४ मध्ये काँग्रेसने ४२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४४ जागा जिंकल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीनंतर २८८ मतदारसंघांपैकी ९० विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाकडे केवळ ४७६ अर्ज आले होते, परंतु आता ही संख्या तिप्पट झाली आहे.
काँग्रेसचे मिशन २०२४
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मविआ बैठकीत काँग्रेसने १३५ जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुंबईतील ३६ पैकी २२ जागांवर शिवसेना ठाकरे गट इच्छुक आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ५-७ जागांवर लक्ष केंद्रित करत आहे. मुस्लीम आणि दलीत मतांमुळे काँग्रेसने मुंबईत जास्त जागांवर लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात जास्त जागा जिंकल्या तर काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. ज्याच्याकडे जास्त जागा असतील तो मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असेल.