Ahmednagar News : बेशिस्त वाहतुकीमुळे तारकपूर रस्त्यावर कोंडी
एकेरी वाहतुकीच्या आदेशाला हरताळ; खासगी बसेसची मुजोरी, प्रवाशी हैराण
नगर, (प्रतिनिधी) – शहरातील पत्रकार चौक (Patrakar Chowk) ते पोलिस अधीक्षक चौकादरम्यान रस्त्याचे काम २६ जूनपासून सुरू झाले. त्यामुळे नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी पत्रकार चौकाकडून या रस्त्याने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिले आहेत, तरीही या आदेशाचे उल्लंघन करत सर्रास वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी (Traffic congestion) होत आहे.
मुंगळा येथील डॉ. विजय केळेंच्या संशोधनाची अमेरिकेत दखल
पत्रकार चौक ते पोलिस अधीक्षक चौकापर्यंतच्या महामार्गाच्या एका बाजूचे काम सध्या सुरू आहे. पत्रकार चौकापासून डाव्या बाजूचा रस्ता मिस्कीन मळा रोड कॉर्नरपर्यंत खोदलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने वाहनांना फक्त तारकपूरकडून येण्यास मुभा आहे, तरीही पत्रकार चौकातून तारकपूरकडे जाणारी वाहने उलट दिशेने एकेरी पट्ट्यातून वाहने पुढे नेत आहेत. त्यामुळे मिस्किन मळ्याकडे वळणार्या चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. सायंकाळच्या वेळी सिंधी कॉलनी परिसरात काही खासगी बसेस प्रवासी घेण्यासाठी थांबतात, त्याही महामार्गावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पत्रकार चौकामध्ये शहर वाहतूक पोलिसांचे कार्यालय आहे. चौकात वाहतूक पोलिसही उभे असतात, तरी वाहने सर्रास तारकपूरकडे जातात.
मुख्यमंत्रिपदावरून ‘मविआ’त धुसफूस! काँग्रेस खासदाराकडून, पटोलेंच्या नावाची झाली घोषणा
दोन रुग्णवाहिका अडकल्या
तारकपूर परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी तारकपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यात १५ मिनिटांच्या अंतराने दोन रुग्णवाहिका अडकल्या होत्या. त्यांना अवघे २५० मीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागली. या रस्त्यावर सिग्नल व वाहतूक पोलिस नसल्याने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. सायंकाळनंतर या रस्त्यावर एका बाजूने वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. काही वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांनी अधिसूचना काढून शहरात खासगी बसेसना थांबे देण्यासाठी विरोध दर्शवला होता. तरीही खासगी बसेस या रस्त्यावर उभ्या राहात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकून पडतात. त्यामुळे या रस्त्याचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी केली जात आहे.
वाहतूक पोलिसांनी फिरवली पाठ
ताराकपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. बसस्थानक असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे ताराकपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक नियंत्रण पोलिसांनी देखील या रस्त्याकडे पाठ फिरवली आहे. वाहतूक कोंडी झाली तरी ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस कधीच या रस्त्यावर दिसत नाही.