औरंगाबाद : मित्र आणि भावांनी मिळून शेतात पार्टी करण्याचा बेत आखला होता. त्यासाठी दोघे जण पुढे गेले मात्र तिसऱ्या तरुणाला बिबट्याने रस्त्यात गाठत हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रविवारी रात्री घडली.
हा हल्ला बिबट्यानेच केला की मग मृत्यूचे दुसरेच काही कारण आहे. हे शव विच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रवींद्र काजळे (रा. रेलगाव, ता. सिल्लोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रवींद्र त्याचा चुलत भाऊ व मित्रांनी मिळून रेलगावातील एका शेतात पार्टी करण्याचे नियोजन केले होते. ठरल्या प्रमाणे रवींद्रचा चुलत भाऊ दीपक हा नियोजित स्थळी मित्रासह पोहोचला. रवींद्र मागून येणार होता. तिथे दोघेही पार्टीचे नियोजन करीत होते.
दरम्यान आठ वाजता गावा जवळील रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दीपकला मिळाली. बराच वेळ उलटून देखील रवींद्र न आल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि दोघांनी घटनास्थळ गाठले असता रस्त्याच्या कडेला आढळलेला मृतदेह हा रवींद्रचाच असल्याचे स्पष्ट झाले.
रविंद्रच्या मानेवर हल्ल्याचे व्रण आहेत. हे व्रण एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यासारखे आहेत. त्यामुळे हल्ला केल्यानंतर बिबट्याने रस्त्याच्या कडेला ओढत आणले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी रुग्णाल्यात हलवले आहे.
शव विच्छेदन होऊन अहवाला प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.